अमरावती जिल्हा


मुख्यालय

अमरावती

तालुके

चांदुर बाजार  चांदुर रेल्वे  चिखलदरा अचलपूर  अंजनगाव सुर्जी  अमरावती तालुका  तिवसा  धामणगांव रेल्वे धारणी  दर्यापूर  नांदगाव खंडेश्वर भातकुली  मोर्शी  वरुड

क्षेत्रफळ

१२,२३५ चौरस किमी (४,७२४ चौ. मैल)

लोकसंख्या

२८,८७,८२६ (२०११)

साक्षरता दर

८८.२३%

लिंग गुणोत्तर

१.०५५ 

लोकसभा मतदारसंघ

अमरावती

विधानसभा मतदारसंघ

अचलपूर  अमरावती  तिवसा  दर्यापूर धामणगांव रेल्वे  बडनेरा  मेळघाट मोर्शी


इतिहास

1.   १८५३ च्या कराराद्वारे हैदराबादच्या निजामाने अमरावती जिल्ह्यासहित सर्व बेरार (वऱ्हाड) ईस्ट इंडिया कंपनीकडे काही काळाकरिता सुपूर्द केला.

कंपनीने वऱ्हाड प्रांताचे दोन जिल्ह्यांमध्ये विभाजन केले -

1.   दक्षिण वऱ्हाड - त्याचे मुख्यालय हिंगोली येथे होते.

2.   पूर्व वऱ्हाड - उत्तर वऱ्हाडचे रूपांतर पूर्व वऱ्हाडात करण्यात आले. त्याचे मुख्यालय अकोला येथे होते.

3.   १८६४ मध्ये अमरावतीमधून यवतमाळ जिल्हा वेगळा करण्यात आला.

4.   १९०३ मध्ये निजामाने वऱ्हाड ब्रिटिश भारत सरकारकडे कायमस्वरूपी सुपूर्द केला.

5.   १९०३ मध्ये वऱ्हाड हा मध्यप्रांताला जोडण्यात आला, आणि मध्यप्रांत व बेरार असा मोठा प्रांत निर्माण करण्यात आला. तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड कर्झन याने वऱ्हाड मुंबई प्रांतास जोडण्यास नकार दिला. मराठी भाषिकांमध्ये प्रांतिक फूट पाडणे हा त्याचा हेतू होता.

6.   १९५६ मधील राज्य पुनर्रचनेदरम्यान अमरावती जिल्ह्यासहित विदर्भातील सर्व जिल्हे तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले.

१९६० मध्ये महाराष्ट्र  गुजरात वेगळे झाल्यावर अमरावती जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला. अमरावती जिल्हा हा पूर्णपणे दख्खनच्या पठारावर आहे. प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौंडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्याएकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असे सांगतात.

अमरावती जिल्हा हा महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३.९८ टक्के क्षेत्र या जिल्हाने व्यापलेले आहे. अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे. विदर्भातील महत्वाचा, शैक्षणिकदृष्ट्या प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. सामाजिक क्षेत्रामध्ये या जिल्ह्याचे नाव खूपच अग्रेसर आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. पंजाबराव देशमुख इत्यादी महत्त्वाच्या व्यक्ती या जिल्ह्यात होऊन गेल्या आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. अमरावती जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले चांदूरबाजार तहसिलातील माधान हे गाव श्री गुलाबराव महाराजांची कर्मभूमी आहे. १९४६ साली डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अमरावतीजवळ तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाची स्थापना केली. अमरावती येथील अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी मंदिरप्रवेश चळवळ सुरू केली. १९३२ साली त्यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय व शिवाजी शिक्षण समितीची स्थापना केली. शिवाजी शिक्षण समिती आज विदर्भातील अग्रणी शिक्षण संस्था आहे. १८९७चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन अमरावती येथे भरले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष सी. शंकरन नायर हे होते.

 

अमरावती जिल्ह्याला अकोला,यवतमाळ, वर्धा आणि वाशीम या जिल्ह्यांच्या सीमा लागल्या आहेत. अमरावती जिल्ह्याची सर्वात जास्त सीमा मध्यप्रदेश या राज्याला लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा सीमावर्ती प्रदेश आहे. या जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी हे तालुके संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहेत. भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील मोठी संस्था आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होणारे दादासाहेब खापर्डे , वीर वामनराव जोशी याच जिल्ह्यातील होते.

अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बाजार हे गाव गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. याच गावी हिंद सेवक संघाची शाखा होती. 

प्रशासकीय विभाग

- जिल्ह्याचे विभाजन १४ तालुके आणि ६ उपविभागांमध्ये करण्यात आले आहे. त्यांचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत.

1.   अमरावती - अमरावती तालुका,

2.   दर्यापूर - दर्यापूर, अंजनगाव सुर्जी.

3.   अचलपूर - अचलपूर, चांदुर बाजार.

4.   मोर्शी- मोर्शी, वरुड.

5.   धारणी - धारणी, चिखलदरा.

6.   चांदुर(रेल्वे)- चांदुर रेल्वे, धामणगांव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर.

7.   भातकुली - तिवसा, भातकुली.

पर्यटनस्थळ

·         अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे. अमरावती शहरापासून ९० किमी अंतरावर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३६हजार फूट उंचीवर सातपुड्याच्या कुशीत आहे. चिखलदऱ्याच्या परिसरात आठ प्रेक्षणीय स्थळे असून गाविलगडचा किल्ला , किचकदरा, आणि विराटराजाचा महाल इत्यादी मुख्य आकर्षणाची ठिकाणे आहेत. वैराट हे येथील सर्वात उंच ठिकाण आहे.

·         सालबर्डी हे पर्यटनस्थळ मोर्शीपासून ८ किमी अंतरावर आहे. येथे महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथील गरमपाण्याचे झरे हे एक प्रमुख आकर्षण आहे. संत मारुतीमहाराजांची समाधी आणि महानुभाव पंथाचे प्रसिद्ध मंदिर ही येथील काही ठळक आकर्षणे आहेत.

·         विदर्भाची प्राचीन राजधानी म्हणून कुंडीनपूर हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते.

·         रिद्धपूर हे महानुभाव पंथीयांचे हे प्रमुख तीर्थस्थळ आहे.

·         अचलपूर तालुक्यातील बहिरम हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे.हे मंदिर सुमारे १२५ फूट उंचीवर आहे. चढण्यास १०८ पायऱ्या आहेत. येथे साडेसहा फूट उंचगणेशमूर्ती आहे.या मंदिरासमोर सहा टन वजनाची घंटा आहे. सातपुड्याच्या कुशीतील हे ठिकाण महाराष्ट्र  मध्यप्रदेशाच्या सीमेवर आहे. येथे बहिरम (भैरव) या देवाची पूजा केली जाते. येथे दरवर्षी महिनाभर जत्रा चालते.ती यात्रा डिसेंबर महिन्यात सुरू होते. येथील मातीच्या हंडीत शिजवलेले मटण खास चवीचे म्हणून खवैय्यांमध्येत प्रसिद्ध आहे.

·         अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक कापूस हे आहे. पूर्णा, तापी व वर्धा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. वर्धा नदीवर सिंबोराजवळ जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. शहानूर नदीवर शहानूर प्रकल्प आहे. अमरावती शहराला वडाळी तलाव व छत्री या तलावांतून पाणी पुरवठा होतो.

·         अमरावती येथे रासायनिक खताचा कारखाना आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये रेगूर ही काळी मृदा मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील हवामान उष्ण व कोरडे आहे. १९४२ च्या चळवळीत या जिल्ह्याचे महत्त्वाचे योगदान आहे. ब्रिटिशांच्या दडपशाहीने जिल्हा हादरून गेला असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरीवर थाप मारून जिल्ह्यातील तरुणांना राष्ट्रीय आंदोलनास प्रेरित केले. ..

·         चिखलदरा या ठिकाणाचे उल्लेख महाभारतात आढळतात. याच ठिकाणी भीमाने कीचकाचा वध करून त्याला दरीत फेकून दिले. त्यामुळे त्याला 'किचकदरा' असे नाव पडले, त्यावरूनच पुढे ते चिखलदरा झाले. महाराष्ट्रातील एकमेव कॉफी उत्पादक प्रदेश म्हणून चिखलदरा ओळखला जातो. आताशा येथे मध व स्ट्रॉबेरीचेसुद्धा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहे. मेळघाट हा जंगलव्याप्त परिसर अभयारण्य म्हणून घोषित केल्या गेला आहे. १९७२ला घोषित केल्या गेलेल्या देशातील १५ व्याघ्रप्रकल्पांतील हा एक. येथे १००हून अधिक वाघ आहेत. वाघांव्यतिरिक्त हा प्रदेश अस्वल, सांबर, रानडुक्कर, जंगली कुत्रे, मोर आदींसाठी प्रसिद्ध आहे.

चिखलदऱ्याजवळची काही आकर्षण केंद्रे :

1.   मेळघाट व्याघ्रप्रकल्प, कोलखास आणि सीमाडोह हे निसर्गरम्य स्थळे.

2.   गाविलगड किल्ला.

3.   नरनाळा किल्ला.

4.   पंडित नेहरू बॉटनिकल गार्डन

5.   ट्रायबल म्युझियम

अलीकडच्या काळात चिखलदरा हे ठिकाण पॅराग्लायडिंगसाठी हळूहळू उदयास येत आहे. भारतात पॅराग्लायडिंग मोजक्याच ठिकाणी होते. महाराष्ट्रातील हे तिसरे ठिकाण आहे.

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.