रायगड जिल्हा

 

रायगड जिल्हयाला ऐतिहासिक आणि भौगोलिक पाश्र्वभूमी लाभलेली आहे. जिल्हयाचा उत्तर -दक्षिण विस्तार १७० कि.मी. असून पूर्व - पश्चिम विस्तार ७० कि.मी. इतका आहे. अरबी समुद्राच्या तटांवर स्थित असलेला हा रायगड जिल्हा तिन्ही बाजूंनी हिरव्यागार नारळाच्या झाडांनी व उंच पर्वतांनी वेढलेला आहे.
रायगड जिल्हयाला शिवाजी महाराजांच्या कारभाराची राजधानी म्हणून मान प्राप्त झाला आहे. शिवाजी महाराजांच्या पवित्र चरणांनी हया भूमिला स्पर्श केलेला आहे. हया अतुलनीय जिल्हयात अजिक्य असा मुरुड जंजिरा किल्ला स्थित आहे. जवळ-जवळ १० छोटे मोठे किल्ले असलेल्या हया रायगड जिल्हयाचे विभाजन १५ तालुक्यांमध्ये केलेले आहे.
दक्षिण काशी“ म्हणून संबोधले जाणारे हरिहरेश्वर हे ठिकाण रायगडात स्थित आहे. सी. डी. देशमुख व स्वर्गवासी परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांसारख्या थोर पुरुषांनी रायगडात जन्म घेतला आहे. आचार्य विनोबा भावे यांचा जन्म गागोदे गावात झाला आहे. या प्रकारे रायगडाला सामाजिक पाश्र्वभूमी देखील लाभली आहे.
औद्योगिक क्षेत्रातही रायगड प्रगती पथावर असून येथील अलिबाग, पनवेल, महाड, उरण तालुक्यांमध्ये हजारो कोटींची औद्योगिक गुंतवणूक आहे. रायगड जिल्हा हा मुंबई लगतचा कोकणातील औद्योगिक जिल्हा असल्याकारणाने भारताच्या कानाकोपर्‍यातून उदरनिर्वाहासाठी येथे जनता स्थित झाली आहे.
रायगड जिल्हयाला जवळ-जवळ १० कि.मी.चा सागरी किनारा लाभल्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी सतत असते. रायगड जिल्हयात मासेमारीमुळे मोठया प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. शिवाय पर्यटनामुळे येथील अनेक स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.

दृष्टिक्षेपात रायगड जिल्हा

स्थान

१७.५१ ते १९.८० अक्षांश , ७२.५१ ते ७३.४० रेखांश

क्षेत्रफळ

७१४८ चौ. कि. मी.

विस्तार

पूर्व - पश्चिम : २५.५० किमी
दक्षिण - उत्तर : १६० किमी

लोकसंख्या 
(
सन २००१ च्या जनगणने नुसार) 

एकुण लोकसंख्या : २२,०७,९२९ 
ग्रामीण लोकसंख्या : १६,७३,०९४ 
शहरी लोकसंख्या : ५,३४,८३५
लोकसंख्या प्रमाण : अनुसुचीत जाती ५३,६६७ (२.४ टक्के) , अनुसुचीत जमाती २,६९,१२४ (१२.४ टक्के)
लोकसंख्येची घनता : ३०८ प्रति चौ. कि.मी. 
साक्षरतेचे प्रमाण : ७७ टक्के (पुरुषः ८६.१ टक्के, स्त्रीयाः ६७.७ टक्के)

तालुके 

(१५) - अलिबाग, उरण, कर्जत, खालापूर, तळे, पनवेल, पेण, पोलादपूर, महाड, माणगाव, मुरुड, म्हसाळा, रोहा, सुधागड (पाली), श्रीवर्धन.

पंचायत समिती

(१५) - पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड-पाली, पेण, उरण, अलिबाग, मुरुड, रोहा, तळा, माणगांव, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर, म्हसळा

औद्योगीक क्षेत्रे

पेण, महाड, पाली, तळे, थळवायशेत, रसायनी, खोपोली, रोहा, नागोठणे, महाड

किल्ले

अलिबाग, कर्नाळा, खांदेरी*उंदेरी, रेवदंडा, कोर्लई, जंजिरा, रायगड, घेरा सुधागड, सरसगड, सुरगड, लिंगाणा.

ऐतिहासिक ठिकाणे

रायगड, अलिबाग, महाड, मुरुड जंजिरा

धार्मिक ठिकाणे

कनकेश्वर, महाड, पाली, जांभुळपाडा, शिवथरघळ, हरिहरेश्वर, उध्दर.

ग्रामपंचायती / गावे

८२१ / १९०८

नगर परिषद

११

नद्या

उल्हास, काळू, पाताळगंगा, भोगावती, अंबा, कुंडलिका, सावित्री, घोड, गंधार

हवामान

उष्ण व दमट, अधिकतम तापमान *४०.४ डी. से. न्युनतम तापमान *१६.१ डी. से.

पर्जंन्यमान

३८८ से. मी.

लेण्या

घारापुरी, तळे, कुडा, अंबिवली, कोंडाणे, खडसांबळे, ठाणाले, पाले, कोल, रामधरण

 

पर्यटन स्थळे

रायगड जिल्ह्यातील किल्ले, जलदुर्ग

कुलाबा किल्ला -

ज्या किल्यामुळे जिल्ह्याला कुलाबा असे नाव देण्यात आले, तो कुलाबा किल्ला किनार्‍या पासुन जवळपास फण कि.मी. अंतरावर आहे. शिवछत्रपतींनी जलदुर्गाचे महत्व लक्षात घेऊन १६८० साली या किल्ल्याची उभारणी सुरु केली. १७ बुरुज असलेल्या या किल्ल्याची लांबी ९०० फूट, रुंदी ३५० फूट व तटबंदीची उंची २५ फूट आहे. आज ३०० पेक्षा जास्त वर्षे उलटली, तरी तो सागरी लाटांची पर्वा न करता, खंबीरपणे उभा आहे. 

समुद्राला पूर्ण भरती आल्यावर किल्ल्याच्या चारही बाजूंना पाण्याच्या प्रचंड लाटा उसळतात. तरीही मुख्य प्रवेशव्दारा पासून सुमारे १५ फूटा पर्यंत भरातीचे पाणी येत नाही. मुख्य भागात पुढील बाजुने व मागील समुद्राच्या बाजुने दोन भव्य प्रवेशव्दारे आहेत. मुख्य व्दारातुन आत गेले की लगेच दुसरा दरवाजा लागतो, तो पार केला की महिषासुराचे दर्शन होते. तसेच तेथे श्रीपद्मावतीची घुमटी आहे. पूर्व दिशेस गडदेवतेचे मंदिर आहे. गणपती मंदिरा जवळच कान्होबाची म्हणजेच कानिफनाथांची घुमटी आहे.

किल्ल्यावरील पुष्करणी समोर १७५९ साली राघोजी आंग्रे यांनी सुरेख गणपती मंदिर उभारले. मंदिरातील सिध्दीविनायकाची मूर्ती उजव्या सोंडेची असून, ती असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान ठरली आहे. गाभार्‍यात अष्टभुजा देवी, श्री शंकर, सुर्य, विष्णु यांच्या अतिशय सुंदर मूर्ती आहेत. या मूर्तींच्या एकत्रीकरणामुळे हे 'श्री गणेश पंचयतन' म्हणून ओळखले जाते.

किल्ल्यामध्ये दगडी बांधकामाचा गोडया पाण्याचा एक तलाव आहे, तसेच गोडया पाण्याची एक विहीर आहे. किल्ल्यातील एका बुरुजावर गाडयावर चढवलेल्या उत्तम स्थितीतील दोन तोफा आहेत.

समुद्राला ज्यावेळी ओहोटी असेल, त्यावेळी आपण किल्ला पाहण्यासाठी जाऊ शकातो. यासाठी भराती ओहोटीचे वेळापत्रक माहिती असणे गरजेचे आहे. कुलाबा किल्ला पहाण्यासाठी पुरातत्व विभागाच्या कार्यालयाचे तिकीट घ्यावे लागते.

उंदेरी किल्ला - 

खांदेरी बेटाशेजारीच साधारण अर्धा किमी. अंतरावर उंदेरी बेट आहे. साधारणत तेथील भूप्रदेश खांदेरीप्रमाणेच आहे. किल्ल्याची तटबंदी शाबूत आहे पण पाण्याचे दुभिक्ष्य आहे. 

खांदेरीप्रमाणेच उंदेरीही मुंबई पोर्ट टस्टच्या ताब्यात असल्याने येथेही त्यांच्या परवानगीनेच जाता येते. कोळयांच्या छोटया होडीतून थळ किनार्‍यावरून या किल्ल्यात जाता येते. उंदेरी किल्ल्यावर उतरण्याकरिता ईशान्येस बोट लावावी लागते.

तत्कालीन इतिहासात महत्व होते ते उंदेरीपेक्षा खांदेरीलाच. खांदेरीवर हल्ले चढवत असतानाच सिध्दी कासमने १६८० साली बेट ताब्यात घेऊन त्यावर किल्ला बांधला. १७६२ साली सखोजी आंग्रेंनी किल्लयावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा किल्ला सिद्यीकडून विकत घेतल्याचे सांगितल्यामुळे शाहू यांनी आंग्रे यांना हा किल्ला विकत घेण्यास सांगितले. १७३६ मध्ये चिमाजी आप्पा व मानाजी आंग्रे यांच्या सिद्यीबरोबर झालेल्या लढाईत उंदेरीचा सुभेदार सिद्यी याकुब मारला गेला. पुढे मराठे व सिद्यी यांच्यात चकमकी होतच होत्या. १७५८ मध्ये तुकोजी आंग्रे यांनी रामाजी महादेव व महादजी रघुनाथच्या मदतीने तसेच १७५९ मध्ये नानासाहेब पेशवे व सरखेल आंग्रेंनी लढाई केली. १७६० मध्ये पेशवे यांचे आरमार सुभेदार नारो त्र्यंबक यांनी हा किल्ला जिंकून घेतला. १८४० नतर मात्र उंदेरी कायमचा इंग्रजांच्या ताब्यात गेला.

जंजिरा किल्ला -

अरबी समुद्रावर आपली अभेद्य जराब बसवुन असणारा, राजापुरी खाडीतील ऐतीहासीक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजापुरी येथे जावे लागते. मुरुड ते राजापुरी अंतर जवळपास ५ कि. मी. आहे.

किल्ला पाहण्यासाठी राजापुरी येथील जेटीवरुन शिडाच्या होडयांची सोय ’’ जंजिरा पर्यटक संस्था मर्या. राजापुरी ’’ या संस्थेनी केली आहे. सकाळी ७.०० वाजल्या पासुन सायंकाळी ६.०० वाजे पर्यंत किल्ल्यात जाण्या येण्यासाठी होडया उपलब्ध असतात. कमीत कमी २० प्रवासी जमल्यावर होडी सोडण्यात येते. होडीने प्रवास करण्यास लागणारी तिकीटे जेटीवर उपलब्ध असतात. साधाराण १० ते १५ मिनीटात होडीने किल्ल्यावर पोहोचता येते. किल्ल्यात उतरण्यासाठी धक्का नसल्याने सावधानतेने उतरावे लागते.

किल्ल्याच्या दोनही बाजूंना बुरुज आहेत, त्याच्यावर एका सिंहाच्या पायाखाली चार, तोंडात एक व शेपटीत एक, असे सहा हत्ती पकडलेलं शिल्प कोरलेल आहे. या मुख्य दरवाजातुन आत गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो. दरवाज्याच्या जवळच पीरपंचायतन असून, तेथील पटांगणात पीरमखानच्या जहाजाचे तीन नांगर पाहाता येतील. येथुन पुढे गेल्यावर एक मोठा गोडयापाण्याचा तलाव दिसतो. तलावाजवळ खाशा सिद्यीची मशिद असुन, आजूबाजूला घरांचे पडके अवशेष दिसतात. दरवाज्या जवळील दोन बुरुज धरुन, किल्ल्याला एकुण २४ बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजाला वेगवेगळी नावे आहेत.

जंजिर्‍याचे मुख्य आकर्षण म्हणजे तेथील प्रवेशव्दाराच्या वरील बाजुस नगारखान्या शेजारी असणार्‍या तीन तोफा. कलालबांगडी, चावरी व लांडा कासम अशी या तोफांची नावे आहेत.

जंजिर्‍याचा इतिहास पाहीला तर साधारणपणे पंधराव्या शतकात कोळयांचा प्रमुख राम पाटील याने चाचे व लुटारुंपासुन कोळयांचा बचाव करण्यासाठी दंडाराजपुरीच्या खाडीतील बेटावर मेढेकोट (लाकडी ओंडक्यांचा किल्ला) बांधला. पुढे या पाटलाचा बंदोबस्त करण्यास निजामाने पीरमखान याची नेमणुक केली, त्याने राम पाटलाचा बंदोबस्त करुन मेढेकोट ताब्यात घेतला. पीरमखानच्या मृत्यु नंतर साधाराणतः सन १५३८ मध्ये त्याच्या जागी बुर्‍हाणखानची नेमणुक करण्यात आली. त्याने मेढेकोट पाडून १५६७ ते १५७१ या काळात पक्का दगडी किल्ला बांधला व त्याचे नामकरण 'किल्ले महरुब' असे केले. छत्रपती शिवराय, राजे संभाजी, पेशवे, आंग्रे अशा अनेकांनी जंजिरा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जंजिरा संस्थान भारतात विलीन करण्यात आले.

जलदुर्ग कासा (पद्मदुर्ग) -

छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीत जंजीर्‍याला लढा देत असतांना त्यांच्या नावीक दलाचा प्रमुख दर्यासारंग दौलतखान याने सन १६६१ मध्ये जंजिर्‍यापासून काही अंतरावर मुरूड शहराच्या किनार्‍यासमोर कासा खडकावर हा किल्ला बांधला. हाच तो कासा उर्फ पद्मदुर्ग. किल्ला तसा छोटासाच पण सहा बुरूजांनी युक्त भक्कम तटबंदी किल्ल्यावर बर्‍याच ठिकाणी कमळाची चित्र कोरलेली दिसतात.

किल्ल्यात वाडयाचे पडके अवशेष आहेतच. शिवाय पाण्याची टाकी आहे परंतु पाणी पिण्यायोग्य नाही. किल्ल्यात असणार्‍या पोलादी तोफा गंजून गेल्या आहेत. जंजिरा किल्ल्यातील कलालबांगडी या तोफेच्या मार्‍यामुळे कासा किल्ल्याचा जंजिर्‍याच्या दिशेचा भाग काही अंशी फुटला होता. सिद्यीच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शिवरायांच्या आरमारी प्रमुख दौलतखान याने उभारलेला हा किल्ला कालांतराने सिद्यीने जिंकून त्याचा वापर तुरूंग म्हणून केला.

ऐतिहासिक वास्तूंबाबत प्रेम असणारे पर्यटक या किल्ल्यास आवर्जुन भेट देतात. पर्यटकांना खाजगी बोटीने किल्ला पहाण्यास जाता येते.

कोर्लई किल्ला -  

कोर्लई किल्ला पाहण्यासाठी आपल्याला कोर्लई गावातून जावे लागते. किल्ल्याच्या पायथ्याशी कोर्लई गाव आहे. शेजारीच कोळीवाडा आहे. कोळीवाडयातूनच आपल्याला किल्ल्याकडे जावे लागते. किल्ल्याचा डोंगर एखादया भूशिरासारखा पाण्यात घुसलेला आहे. तीन बाजूला पाणी आणि दक्षिण बाजूला जमिनीशी सांधलेला हा किल्ला सन १५२१ मध्ये दियोगु लोपिश दि सैकर या पोर्तुगीज सैन्याधिकार्‍याने बांधल्याचे म्हटले जाते.

मुख्य किल्ला पूर्व*पश्चिम जवळपास शंभर फुट तर दक्षिणोत्तर जवळपास एक हजार फुट विस्तारलेला आहे. किल्ल्याच्या प्रवेशारावर लढल्याशिवाय आत प्रवेश नाही (None Passes me but fights) असा इशारा दगडावर कोरलेला आहे.

किल्ल्यास सात दरवाजे आहेत. किल्ल्यात गोडया पाण्याची विहिर मोडकळीस आलेला चर्च तसेच एक मंदिर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी समुद्रास खेटून एक जुने दीपगृह आहे. असा हा ऐतिहासिक किल्ला बरीच वर्षे पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. सन १७४० च्या आसपास तो मराठयांच्या ताब्यात आला. परंतु १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच इंग्रजांच्या ताब्यात गेला.

किल्ले रायगड - 

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेतील अत्यंत महत्वाचा टप्पा व पुढील राजकारभाराचा एक महत्वाचा साक्षीदार असा हा रायगड किल्ला, जिल्ह्याचे नाव देखील या किल्ल्यावरुनच पुढे आलेले आहे.

रायगडावर ९ जुन १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन खर्‍या अर्थाने छत्रपती झाले.

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला हा किल्ला एक नुसता एक गड नसुन ते एक राष्ट्रीय स्मारक आहे.

रायगडावर पहाण्यासाठी होळीचा माळ, भवानी मंदीर, जित दरवाजा, खुब लढा बुरुज, महादरवाजा, मिना दरवाजा, राणी वसा, पालखी दरवाजा, राजभवन, राजसभा,गंगासागर, नगारखाना, जगदिश्वर मंदिर, बारा टाकी, वाघदरवाजा, टकमक टोक, रामेश्वर मंदिर व शिवछत्रपतींची समाधी इ. ठिकाणे आहेत.

रायगडावर चढण्यासाठी साधारण १४५० पयर्‍या चढुन जावे लागते, साधारण ३.५० तासाची चढण आहे, आता 'बांधा, वापरा, हस्तांतरीत करा' या तत्वावर केबल कार सेवा सुरु झालेली आहे. या मुळे पर्याटकांची फारच सुविधा झालेली आहे.

सागरगड - 

अलिबागपासून ७ किमी.अंतरावर डोंगरावर हा शिवकालीन किल्ला आहे. हा समुद्रसपाटीपासून सुमारे १३५७ फूट उंचावर आहे. येथे जाण्याकरीता अलिबाग - पेण मार्गावरील खंडाळा गावातून रस्ता आहे. गावाच्या पूर्वेला डोंगर दिसतो. त्याच्या पाठीमागे सागरगड लपलेला आहे. खंडाळा गावातून फलवाटेने गडावर जावे लागते. गडाच्या निम्म्या उंचीवर सिध्देश्वर मंदिर आहे. या मंदिराजवळच आश्रम तसेच विहीर आहे. येथे विश्रांतीची सोय होऊ शकते. पावसाळयाच्या दिवसात मंदिराजवळच एक धबधबा वहात असतो. श्रारावणी सोमवारी येथे बरेच भाविक हजेरी लावतात. या आश्ररमाच्या थोडं अलिकडेच एक वाट डावीकडे वर सागरगडाकडे जाते. सिध्देश्वरपासून साधारणत फन ते एक तासात आपण सागरगडावर येवून पोहचतो. सागरगडाच्या मुख्य दरवाजा पूर्णपणे ढासळलेला आहे. परंतू त्याच्या बाजूचे दोन बूरूज पडक्या अवस्थेत अस्तत्त्वात आहेत. या प्रवेशारातून गडावर प्रवेश करायचा. माची व बालकिल्ला अशा स्वरूपात गडाची रचना आहे. बालेकिल्लेवर एक लहानसं तळं मंदिर तसेच एका पडक्या इमारतीचे अवशेष आहेत. गडावर एक बारमाही पाण्याचे कुंड (पांडवकुंड) आहे.

माचीवर सतीची माळ नावाची जागा आहे. तिथं नऊ थडगी आहेत. या बाजूच्या टोकाला एक सुळका आहे त्यास वानरटोक असे म्हटले जाते. गडावर इतर कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.

खांदेरी किल्ला - 

अलिबागपासून ४-५ किमी. अंतरावर थळच्या किनार्‍यापासून ३ किमी. अंतरावर खांदेरी बेट आहे. या बेटावर १६७८ साली किल्ला बांधण्यात आला. आजूबाजूचा परिसर खडकाळ असून बेटावर १५-२० मीटर उंचीच्या टेकडया आहेत. टेकडयांच्या मधला भागही पाण्यापासून २०*२५ फूट उंचीवर आहे. तिथे जवळच बोटीचा धक्का आहे. या बेटाच्या भोवतालचा भाग खूपच खडकाळ असल्याने बोटींना मार्गदर्शन व्हावे म्हणून इथे १७६८ साली दिपगृह उभारण्यात आलं. अलिबागच्या कुलाबा किल्ल्याप्रमाणे या किल्ल्यातही गोडया पाण्याची विहीर आहे. दीपगृहाच्या रस्त्यावर एक प्रचंड शिळा असून जर एखादया छोटया दगडाने त्या शिळेवर आघात केला तर एखाद्या भांडयावर दगड मारल्यास जसा आवाज येतो. तसा आवाज येतो.

किल्ल्याची तटबंदी शाबूत असून किल्ल्याचे दरवाजे मात्र शाबूत नाहीत. खांदेरी किल्ल्याचा तत्कालीन इतिहास थोडक्यात असा आहे. शिवछत्रपती खांदेरी बेटावर किल्ला बांधत आहेत ही बातमी जेव्हा इंग्रजांना समजली तेंव्हा इंग्रजांनी मायनाक यास बांधकाम थांबिवण्याचा आदेश दिला. परंतु मी फक्त छत्रपती शिवरायांचा हुकूम मानणारा सेवक आहे तुम्ही आदेश देणारे कोण असे रोखठोक प्रति उत्तर मायनाक यांनी पाठविले. १६७९ साली थळच्या किनार्‍यावर उभयपक्षी अनेक लहान मोठया चकमकी उडाल्या. अशा तर्‍हेने इंग्रजांना छत्रपतींचे आरमारी सामर्थ्य मान्य करावे लागले. १७७५ साली खांदेरी इंग्रजांच्या ताब्यात होता. १७८७ साली राघोजी आंग्रेंनी ताबा घेतला. १८१४ साली खांदेरीचा ताबा दुसरा बाजीराव पेशवे यांच्याकडे गेला. पुन्हा १८१७ रोजी खांदेरीचा ताबा आंग्रेजवळ आला.

सध्या खांदेरी किल्ला मुंबई पोर्ट टस्टच्या ताब्यात असल्याने किल्ल्यावर त्यांच्या परवानगीनेच जाता येते. किल्ल्यात स्थानिक कोळ्याच्या बोटीने जाता येते. 

रायगड जिल्ह्यातील देवस्थाने, मंदिरे

शितळादेवी मंदिर -

अलिबाग स्थानकापासून सुमारे १७ किमी. अंतरावर तर चौल नाक्यावरून अंदाजे तीन किमी. अंतरावर पुरातन असे शितलादेवी मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी अलिबाग स्थानकातून अलिबाग-रेवदंडा एसटीने चौलनाका येथे उतरावे लागते. तेथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी रिक्षांची उत्तम सोय आहे. स्वतच वाहन असल्यास थेट मंदिरापर्यंत जाता येते.

पूर्वीची स्थती लक्षात घेता हे मंदिर चौलच्या दक्षिणेस खाडीजवळ होते. परंतु सद्यस्थतीतील जवळपासची खाडी भरून बरीच जमीन वाढली आहे. या ठिकाणी पूर्वी आंग्रेकालीन लाकडी व कौलारू मंदिर होते. त्याचा १९९० साली जिर्णोध्दार होऊन येथे सिमेंट काक्रेटचे मंदिर उभारण्यात आले. गाभार्‍यात देवीची मूर्ती मूळच्या ठिकाणीच स्थानापन्न आहे. पूर्वाभिमूख मुख्य प्रवेशाराशिवाय उत्तर व दक्षिण बाजूसही प्रत्येकी एक प्रवेशार आहे.

येथील देवीचे स्थान हे जागृत समजले जाते. त्यामुळे या मंदिराला बरेच भाविक पर्यटक आवर्जुंन भेट देतात.

पालीचे श्री बल्लाळेश्वर मंदिर -

अष्टविनायकां पैकी प्रसिध्द श्री बल्लाळेश्वराचे मंदिर रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात पाली येथे आहे. पाली हे सारसगड व अंबा नदी यांच्या मधे वसलेले आहे. 

सर्वात जवळचे रेल्वे स्थानक म्हणजे कर्जत हे अवघे ३० कि.मी. आहे. अलिबाग पासुनचे अंतर साधारण ६० कि.मी. आहे.
बल्लाळेश्वराची मुर्ती पुर्वाभिमुख आहे, उपरणे व अंगरखा असा ब्राम्हण वेश ल्यायलेला हा अष्टविनायकातील एकमेव गणपती आहे.

महडचे श्री वरदविनायक मंदिर -

अष्टविनायकां पैकी प्रसिध्द श्री वरदविनायकाचे मंदिर रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात महड येथे आहे. प्राचीन काळी महड हे भद्रक, मढक या नावाने ओळखले जात असे. 

वरदविनायक हा भाक्ताच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा व मनोकामना पुर्ण करणारा देव आहे.

पेशव्यांचे सरदार रामजी महादेव बिवलकर यांनी साधारण १७३० मध्ये हे मंदिर बांधुन लोकार्पण केल्याचा उल्लेख आहे, मंदिर साध्या बांधणीचे व लहानसे असुन कौलारु आहे.

माघ व भाद्रपद महिन्याच्या सुरवातीचे पाच दिवस येथे मोठा उत्सव असतो. मंदिरा मध्ये १८९२ पासुन नंदादीप सतत तेवत आहे.

श्री विक्रम विनायक मंदिर -

अलिबागपासून सुमारे २० किमी. तर मुरूडपासून ३२ किमी. अंतरावर साळाव या निसर्गरम्य गावी उंच टेकडीवर श्री विक्रम विनायक मंदिर बांधले आहे. या ठिकाणी बिर्ला उद्योग समुहाच्या विक्रम इर्स्पात कंपनीचा भव्य प्रकल्प असून सदर मंदिर बिर्ला उद्योग समूहाने बांधले आहे. पांढर्‍याशुभ्र संगमरवरातून साकारण्यात आलेला मंदिराचा भव्य कळस अती दूरवरूनही नजरेस पडतो. टेकडीच्या पायथ्याशी प्रवेशार आहे. येथून मंदिराकडे जाणारा रस्ता पायर्‍यांचा आहे तसेच पायर्‍यांच्या जवळूनच नागमोडी वळणाचा वाहनांसाठी बनवलेला रस्ताही आहे. मंदिराच्या सभोवताली नयनरम्य बागबगिचा असून त्यातील फुलझाडे रंगीत कारंजी नेत्रसुखद आकर्षक असल्यामुळे मन प्रसन्न होते. मंदिराचा सभामंडप चारही बाजूंनी मोकळाच असून छत पारदर्शक पॉलिकॉप र्शिटचे असल्यामुळे सभामंडपात प्रकाश व मोकळया हवेचा संचार असतो. मंदिराच्या चौकोनी गाभार्‍यात श्री गणेशाची भव्य मूर्ती आहे. बाजूच्या लहान मंदिरातून राधा-कृष्ण शंकर-पार्वती देवी दुर्गामाता आणि सुर्यदेव यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. मंदिराच्या परिसरीतील बागेमध्ये स्व. आदित्य बिर्ला यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. बागेचा परिसर व मंदिर यांतील विद्युत रोषणाई नेत्रदिपक व आकर्षक आहे.

अल्पावधीतच या मंदिराची किर्ती महाराष्टाबाहेर पोहोचल्यामुळे या ठिकाणी भक्तगण तसेच पर्यटक सतत येत असतात. सकाळी ९.०० आणि संध्याकाळी ७.१५ वाजता मंदिरात आरती व पूजा होते. सकाळी ६.०० ते ११.३० व संध्याकाळी ४.३० ते ९.०० या वेळेतच मंदिरात प्रवेश दिला जातो. अलिबागपासून मंदिरापर्यंत तसेच रेवदंडयापासून मंदिरापर्यंत एस.टी. तसेच तीन सहा आसनी रिक्षांची उत्तम सोय आहे. भक्तांना मनशांती व सुख समाधान लाभणारे हे ठिकाण आहे.

श्री दत्त मंदिर (चौल-भोवाळे) -  

अलिबागपासून १६ किमी. अंतरावर तर चौल नाक्यावरून २ किमी. अंतरावर भोवाळे या निसर्गरम्य गावातील गोंगरवजा टेकडीवर हे दत्तमंदिर आहे. डोंगराच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर पायर्‍या पायर्‍यांनी मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यंत विलोभनिय वाटतो.

साधारण पाचशे पायर्‍या चढून गेल्यावर डाव्या हाताला एक लहानसा श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी मठ आहे. पुढे साधारण पंचवीस तीस पायर्‍या चढून गेल्यावर श्री दत्त मंदिर विश्रारांती स्थान म्हणून सद्गुरू बुरांडे महाराज समाधी पहावयास मिळते. पुढे सुमारे दिडशे पायर्‍यानंतर सत्चित आनंद साधना कुटी आहे. त्यापुढे हरे राम विश्रामधाम त्यानंतर हरे राम बाबांचे धुनीमंदिर त्यापुढे औदुंबर मठ पहावयास मिळतो. इथपर्यंत आल्यानंतर आधुनिकतेचा स्पर्श झालेल्या दत्तमंदिराच्या दर्शनाने मन प्रसन्न होते. मंदिराच्या दक्षिणेला माई जानकीबाई व हनुमानदासबाबा मठ आहे.

दत्तमंदिरातील दत्तमुर्ती त्रिमुखी सहा हात असलेली पाषाणाची आहे. देवळाभोवती प्रदक्षिणेसाठी मोकळी जागा आहे. मुख्य गाभारा थोडासा उंचावर आहे. देवालयाच्या कमानीपासून गाभार्‍यापर्यंत छोटासा जिना आहे. दरवर्षी दत्तजयंतीपासुन पाच दिवस दत्तजयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या पाच दिवसांत फार मोठी जत्रा भरते. सदर दत्तमंदिर आज महाराष्ट व इतरत्र एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्दीस आले आहे.

चौलचे श्री रामेश्वर मंदिर -

अलिबाग रेवदंडा रोडवर अलिबागपासून सुमारे १४ किमी. अंतरावर प्राचीन असे हे रामेश्वर मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून समोर पुष्करणी आहे. घडीव दगडात बांधलेले हे मंदिर हेमांडपथिय पध्दतीसारखे वाटते. परंतु ते केंव्हा व कुणी बांधले याचा उल्लेख मिळत नाही. सदर मंदिराचा जिणोध्दार अनेकदा झाल्याच्या आंग्रेकालीन नोंदी आहेत. 

रामेश्वर मंदिराचा गाभारा सुमारे ४.४२ मीटर असून मध्यभागी १.५ मीटर लांब रूंद व जमिनिपासून थोडी उंच पितळी पत्र्याने मढवलेली शाळुंका आहे. तिच्या मध्यभागी नेहमीप्रमाणे उंच लिंग नसून चौकोनी खयात स्वयंभू मानलेले शिवस्वरूप आहे. गाभार्‍याच्या जमिनीपासून सुमारे ७. ६२ मीटीर उंच असलेल्या शिखराचे व संपूर्ण गाभार्‍याचे बांधकाम दगडी आहे. गाभार्‍याची संपूर्ण इमारत स्वतंत्र असून ती बाहेरील उंच शिखर असलेल्या घडीव दगडी मंदिरात समाविष्ट आहे. गाभार्‍याच्या समोर सभामंडप असून त्यात तीन कुंड आहेत. रामेश्वराच्या दर्शनासाठी सभामंडपात उभे राहिले असता उजव्या बाजूच्या कमानीत नारायणाच्या मूर्तीसमोर पर्जन्यकुंड आहे. डाव्या बाजूस कमानीत गणपतीची मूर्ती असून त्याच्या समोर वायुकुंड आहे तर मध्यभागी अग्नीकुंड आहे. 
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते. महाशिवरात्रीच्या वेळी मोठा उत्सव साजरा केला जातो.

नांदगावचा श्री सिध्दीविनायक -

मुरूडच्या उत्तरेस जवळपास ९ किमी. अंतरावर हे नांदगावचे प्राचीन सिध्दीविनायक मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे समस्त श्रध्दाळूंचे श्रध्दास्थान सोळाव्या शतकातील प्रसिध्द जोतिर्वोद पंचांगकर्ते गणेश दैवज्ञ यांच्या घराण्यांचे सिध्दीविनायक हे आराध्य दैवत होय. अष्टविनायकाच्या दर्शनाची फलश्रुती या गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर पूर्ण होते. अशी गणेशभक्तांची श्रध्दा आहे.

माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला येथे माघी गणेशोत्सव मोठया धुमधडाक्यात साजरा होतो. येथील एकदिवसीय यात्रेचे मोठे आकर्षण असते. दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला असंख्य भक्त सिध्दीविनायकाच्या दर्शनास आवर्जुन येतात.

श्री कनकेश्वर -

अलिबाग पासून सुमारे १३ कि. मी. अंतरावर, शहराच्या इशान्य दिशेला श्री कनकेश्वरचा ९०० फूट उंचीचा डोंगर आहे. समुद्रसपाटीपासून देवस्थानाची उंची साधारण १२७५ फूट इतकी होईल. 

श्री कनकेश्वराला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक आहे मापगांव मार्गे व दुसरा आहे झिराड मार्गे. 

नगमोडी वळणाने पायर्‍यांवरुन चालताना जवळपास ५००० फूट गड चढावा लागतो. पायथ्याशी असलेल्या दत्तमंदिरापासून चढण्यास सुरुवात केल्यावर साधारण १००० फूट अंतर पार केल्यावर उजव्या बाजूस 'मोहनगिरी' 'बालगिरी' या दोन तपस्व्यांच्या समाध्या आहेत. येथुन साधारण ५०० फूटावर 'नागोबाचा टप्पा' आहे, येथुन ७५० फूटावर 'जांभळीचा टेप' लागतो, पुढे साधारण १०० फूटावर एक पायरी लागते त्यास ’’ देवाची पायरी ’’ असे म्हणतात. नीट निरीक्षण केल्यास या पायरीवर संपुर्ण पावलाचा ठसा दिसतो. या नंतर गायमांडी लागते व येथुन सपाटीचा रस्ता चालु होतो, दक्षिणेकडे सागरगडचा डोंगर व पश्चिमेकडे अरबी समुद्राचे विहंगम दृष्य दिसते. गायमांडीच्या पुढे 'पालेश्वर' हे घुमटीवजा शिवमंदिर आहे. त्याच्या पुढे गेल्यावर 'ब्रम्हकुंड' लागते, शेजारीच मारुती मंदिर आहे, उजव्या हाताला बलराम कृष्ण मंदिर आहे. पुढे अष्टकोनी पुष्करणी असुन त्याच्या पश्चिमेस श्री शंकराचे भव्य मंदिर आहे. देवळाचे बांधकाम यादव घराण्यातील राजे रामदेव यांच्या कारकिर्दीत झाले आहे. श्री कनकेश्वर मंदिराची उंची ५४ फूट आहे. श्री कनकेश्वर हे एक प्राचीन स्वयंभू शिवस्थान आहे. 

या ठिकाणी भाविक पर्यटकांच्या रहाण्याची तसेच घरगुती भोजनाची उत्तम सोय आहे.

श्री हरिहरेश्वर -

हरिहरेश्वर हे ठिकाण ’’ दक्षिण काशी ’’ म्हणुन ओळखले जाते, त्याच प्रमाणे येथील समुद्र किनारा पार्यटकांमध्ये प्रसिध्द आहे.

समुद्र किनार्‍यावरच श्री शंकराचे भव्य मंदिर आहे, मंदिराचे बांधकाम काला बद्यल निश्चित माहिती नसली तरी पहिल्या बाजिराव पेशव्यांनी मंदिराचा जिर्णोध्दार केल्याची माहिती आहे.

मंदिरामध्ये ब्रम्हा, विष्णु, महेश व देवी पावेतीच्या मुर्ती आहेत, त्याच प्रमाणे श्री काळभैरव व योगेश्वरी यांच्या मुर्ती देखील आहेत.

मंदिर जरी समुद्र किनार्‍यावर असले तरी प्रदक्षिणा मार्ग डोंगरा वरुन व समुद्रा मधुन आहे.

रायगड जिल्ह्यातील बीच, समुद्र किनारे

किहिम बीच -

अलिबागपासून १२ कि.मी. अंतरावर इतर किनार्‍याप्रमाणेच निसर्गाचे वरदान घेऊन किहीमचा रम्य किनारा निसर्गप्रेमिकांचे मन रिझवत आहे. अलिबाग-रेवस रस्त्यावरील चढी किहीम फाटयावर उतरल्यावर पश्चमेकडे जाणारा रस्ता हा किहीम गावातून समुद्रकिनारी जातो. छायाचित्रणासाठी आपणांस अनेक नैसर्गक सौंदर्यस्थळे या किनार्‍यावर आढळतील. नारळीर्‍पोफळींची दाट वनश्री आणि आकाशाला गवसणी घालणारी सुरूची झाडे किनार्‍याची शोभागिुणीत करतात. त्यामुळेच या किनार्‍यावर पर्यटकांची खूप गर्दी असते. येथील सृष्टीसौंदर्यात आगळीच भर टाकणारा स्वच्छ नितळ अथांग सागर पर्यटकांना कुठल्याही ऋतुत आग्रहाचे निमंत्रण देत असतो.

या समुद्रकिनारी महाराष्ट पर्यटन विकास महामंडळातर्फे पर्यटकांसाठी तंबुंची सोय करण्यात आलेली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात माडांच्या गर्द झाडीत समुद्राच्या कुशीत रहाण्याची मौज काही औरच मात्र ही मौज अनुभवयाची ती फक्त उन्हाळा किंवा हिवाळयातच. पावसाळयात तंबूत रहाण्याची मजा लुटता येत नाही. परुतु वर्षाचे बाराही महिने किहीम गावात अनेक ठिकाणी घरगुती रहाण्याची तसेच भोजनाची व्यवस्था होते.

आक्षी बीच -

अलिबाग-खेदंडा रोडवर अलिबाग स्थानकापासून सुमारे ५ किमी. अंतरावर आक्षीचा किनारा आहे. येथे जाण्यासाठी आक्षी स्थानकाजवळ असलेल्या स्तंभाजवळून आतमध्ये एक ते दीड किमी. जावे लागते. स्वतचे वाहन असल्यास थेट किनार्‍यापर्यंत आपण जाऊ शकता. किनारा स्वच्छ सुंदर प्रदुषणविरहित असून सुरूच्या बनांनी नटलेला आहे. या किनार्‍यावरून आपल्याला अलिबाग बीचचे तसेच तसेच कुलाबा किल्ल्याचे दर्शन घडते.

अलिबाग बीच -

अलिबाग एस.टी. स्थानकापासून सुमारे एक कि.मी. अंतरावर पश्चमेस साधारण ४-५ किमी. लांबीचा वालुकामय किनारा आहे. मारूती नाक्यावरून थेट पश्चमेला किनार्‍याकडे जाणारा रस्ताही तितका स्वच्छ व हवेशीर. या रस्त्यावरून तुम्ही जेव्हा किनार्‍याकडे जाल तेव्हा वाटेत सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयाची इमारत, मुख्य पोस्ट ऑफिस, जिल्हा रूग्णालय, शासकीय विश्रामगृह, जिल्हा परिषद पत्रकार भवन ही अलिबागमधील महत्वाची ठिकाणे येतील. उजव्या हाताला क्रिडाभुवनचे प्रशस्त मैदान लागेल. किनार्‍यावर पोहोचल्यावर ऐतिहासिक कुलाबा किल्ल्याचे दर्शन होईल.

संपूर्ण किल्ल्याचे अवलोकन करीत मऊशार वाळूतून चालत असता किनार्‍यावरील सुरूची उंचच उंच झाडे त्यांना साथ देणारी नारळाच्या झाडांची शोभा आपले मन खचितच मोहून टाकेल यात शंका नाही. किनार्‍यावरील खाजगी व सरकारी बंगल्यामुळे हा किनारा अधिकच खुलून दिसतो. शिवाय किनार्‍यावर शहाळयाचे पाणी आईस्क्रम भेळपूरी पॅटीस इ. खादयपदार्थ विक्रेते क्षुधाशांतीसाठी आहेतच. सागरलाटांच्या खळाळत्या नादसौदर्याचा अनुभव येथेच घ्यावा. जसजसा सूर्य अस्तास लावू लागेल तेव्हा जरा क्षितीजाकडे नजर टाका व आकाशाच्या रंगपटावर उधळणार्‍या सप्तरंगाची आतिषबाजी पहा. अशावेळी अंधुक प्रकाशात समोरील किल्ल्याचा गगनभेदी दरारा आपणांस हळूच इतिहासात ओढू लागेल. वाळूतून लगबगीने फले टाकीत पाठीवर जाळे सांभाळीत ओल्या कपडयांची पर्वा न करता आपल्या मस्तीत गात गात घरी निघालेल्या मच्छमार बांधवांच्या कोळीगीताला साथ देण्याचा मोह तुम्हाला आवरता येणार नाही.

अलिबाग एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्दीस आल्यापासून अलिबाग बीचवर नेहमी प्रवाशांची वर्दळ असते. जरी वर्दळ असली तरी आवाजाचे प्रदूषण नाही. म्हणूनच ही बीच म्हणजे अलिबागचे एक वैशिष्टय आहे.

काशिद बीच -

मुरूडच्या उत्तरेस जवळपास १८ किमी. अंतरावर गोव्यामधील बीचची आठवण करून देणारा रूपेरी वाळूचा स्वच्छ सुंदर काशिदचा समुद्रकिनारा विदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

काशिदच्या किनार्‍यावरील सुरूंच्या नयनमनोहरी बागांतून विश्रांतीस थांबलेल्या पर्यटकांची गर्दी पाहूनच या स्थानाचे महत्व लक्षात येते. विकएंडला शेकडो पर्यटक इथे समुद्रस्नानासाठी जमतात. मॉडेंलिंग टि.व्ही. सिरीयल व सिनेमांचे शूटींग येथे सातत्याने होत असते.

समुद्रकिनारी छोटया स्टॉलपासून परिपूर्ण सुविधा असणारी हॉटेल्स रिसॉर्टस् यामुळे काशिद बीच पर्यटकांचे मोठे आकर्षण बनला आहे.

नागाव बीच -

येथे जाण्यासाठी अलिबाग एस.टी. स्थानाकापासून अलिबाग-रेवदंडा रस्त्यावर ७ किमी. अंतरावर असणार्‍या नागांव ऑफीस येथे उतराव लागते. तेथील शिवछत्रपतीच्या पुतळयाजवळील रस्त्याने गेल्यावर दोन-अडीच किमी. अंतरावर हे बीच आहे. या बीचला साताड बंदर असेही म्हणतात. येथील वैशिष्टय म्हणजे किनार्‍यावरील एका रांगेत असणारी डौलदारपणे डुलणारी सुरूची झाडे व रूपेरी वाळूचा स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा त्यावर फेसाळणार्‍या अथांग समुद्राच्या पांढर्‍याशुभ्र लाटा पर्यटकांना फारच मोहीत करतात. येथे पर्यटकांसाठी नाष्टा जेवण तसेच निवासाच्या भरपूर सोयी आहेत. पर्यटक या किनार्‍यावर इतके खुश आहेत कि महाराष्ट शासनाने पर्यटकांच्या ष्टीकोनातून या किनार्‍याकडे विकासाकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. पर्यटकांना मोहविणार्‍या या निसर्गसंपन्न किनार्‍याला जरूर भेट द्या.

रेंवदंडा बंदर - 

अलिबाग स्थानकापासून १७ किमी. अंतरावर असणारे हे ऐतिहासिक बंदर आहे. याच ठिकाणी रोहयाहून येणार्‍या कुंडलिका नदीचा अरबी समुद्राशी संगम होऊन खाडी तयार झाली आहे. रेवदंडा बंदराच्या पलिकडे साळाव गावापासून मुरूड तालुक्याची हद्द सुरू हते. या खाडीवर बांधलेला मुरूड आणि अलिबाग तालुके जोडणारा वाहतुकीच्या संदर्भात उपयुक्त ठरणारा साळाव खाडी पूल १९८६ पासून वाहतुकीस खुला झाला आहे. या पुलावरून मुद्दामहून फेरफटका मारा. सभोवतालच्या नैसर्गिक परिसराची अजब किमया तुम्हाला गुंग करील. साळावकडील टोकावरून संपूर्ण रेवदंडाचा परिसर सागराचे विलोभनीय दर्शन खाडीतील गलबतांची वहातुक तसेच डाव्या बाजूला दूरवर दिसणारे विक्रम इस्पात कंपनी तर उजव्या बाजूस या पुलाजवळच विक्रम इस्पात कंपनीची जेटी दिसते.

रेवदंडा बंदराजवळच एस.टी. स्थानक तसेच तीन व सहा आसनी रिक्षांचे स्थानक आहे. एस.टी. स्थानकाच्या मागील बाजूस खाडीत छोटासा धक्का पकटी आहे. या भागात मासेमारीचा व्यवसाय जोरात चालतो. मासे पकडून आणलेली गलबते होडया या धक्क्याजवळच थांबतात. या ठिकाणी ताज्या मासळीची खरेदी-विक्री होते.

रेवस बंदर -

अलिबाग एस्. टी. स्थानकापासून सुमारे २३ किमी. अंतरावरील हे बंदर मुंबई-रेवस वहातुकीमुळे एक महत्त्वाचे बंदर ठरले आहे. मुंबईहून लाचने येणारे प्रवासी तसेच उरणहून करंजामार्गे तरीने येणार्‍या प्रवाशांची वर्दळ नेहमीच या बंदरावर असते. बंदराभोवतालचा सारा भूप्रदेश नैसर्गक सौंदर्याने नटलेला आहे. धक्कयावर उभे राहिले असता समोर करंजार्‍उरणचा किनारा उंच भागातील छोटे-छोटे बंगले मच्छमार बांधवांची गलबते तसेच लाटांवर डुलणार्‍या होडयांची विलोभनीय दृष्ये नजरेस पडतात. हवामान स्वच्छ असल्यास मुंबईतील गगनचुंबी इमारतींचे दर्शनही खेस धक्कयावरून होते. या बंदराच्या परिसरात फिरताना एक वेगळाच आनंद मिळतो. धक्कयापासून जवळच एस्. टी. स्थानक आहे तसेच तीन व सहा आसनी रिक्षांचीही उत्तम सोय आहे.

मांडवा बंदर -

अलिबाग एस्.टी. स्थानकापासून सुमारे १९ किमी. अंतरावर हे एक निसर्गसंपन्न बंदर आहे. अलिबाग-रेवस रस्त्यावर मांडवा फाटयावर उतरून बंदराकडे जावे लागते. इतर बंदरांप्रमाणे नैसर्गक सृष्टीसौंदर्याचे वरदान लाभल्यामुळे हे आगळेवेगळे असे पिकनिक पॉईंट झाले आहे.

या बंदराच्या धक्कयाला मुंबईहून (गेट वे ऑफ इंडिया ) येणार्‍या पी.एन्.पी. सर्व्हसेस कॅटमरान अजंठा कॅटमरान यांच्या स्पीडबोट तसेच अजंठा सर्व्हीस अलसिद्दीक मोटार बोट लागतात. मांडव्याच्या समुद्रकिनारी अनेक धनिक लोकांचे बंगले तसेच फार्महाऊस आहेत.

रायगड जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळे

भू-चुंबकीय वेधशाळा -

एप्रिल १९०४ साली ’’ अलिबाग भूचुंबकीय वेधशाळेची ’’ स्थापना करण्यात आली. ही वेधशाळा दोन इमारतीत विभागली असुन एका इमारतीत मॅग्नेटोमीटर बसविलेले आहेत. त्याच्या सहाय्यने भूचुंबकीय क्षेत्रामध्ये दररोज होणार्‍य बदलांची नोंद केली जाते. मॅग्नेटोमीटरच्या सभोवताली एक मीटर रुंदीच्या तीन भिंती आहेत. त्यामुळे मॅग्नेटोमीटर ठेवलेल्या खोलीतील तापमानात जास्त बदल होत नाहीत. दुसर्‍या इमारतीत भूचुंबकीय क्षेत्राच्या विविध घटकांचे निरपेक्ष मापन केले जाते. या इमारतीच्या बांधकामामध्ये चुंबकीय गुणधर्म नसलेले पोरबंदर वाळुचे दगड, पितळ व तांब्याच्या वस्तु वापरल्या आहेत.

वेधशाळेमध्ये होत असलेल्या भूचुंबकीय क्षेत्राच्या नोंदींचा उपयोग भूचुंबकीय वादळाची तसेच इतर अनेक चुबकीय कार्यप्रकि्रयांची माहिती मिळण्यास होतो. त्या मुळेच जगभरातील शास्त्रज्ञांकडुन या भूचुंबकीय माहितीला सतत खूप मागणी असते. या वेधशाळेचे जगतास होत असलेले योगदान लक्षात घेवून भारत सरकारने १९७१ साली या वेधशाळेची पुर्नस्थापना ’’ भारतीय भूचुंबकत्व संस्था ’’ विज्ञान आणि तंत्रज्ञान या विभागा अंतर्गत कार्यरत केली. अधुनिक काळाची गरज लक्षात घेवून अलिबाग येथील भूचुंबकीय बदल नोंदणार्‍या साधनांचे नुतनीकरण केले गेले. ’’ इंटरमॅग्नेट ’’ या अंतरराष्ट्रीय प्रकल्पाची गरज तसेच सहभागाच्या दृष्टीकोनातुन १९९७ पासुन अलिबाग वेधशाळेने १ मिनीट इतक्या सुक्ष्म कालावधीत घडून येणार्‍या भूचुंबकीय बदलांची नोंद करुन ती मिनीटा गणिक अंतरराष्ट्रीय केंद्राकडे पाठविण्यास एप्रिल २००१ पासुन सुरुवात केली.

या वेधशाळेत जवळजवळ १५० वार्षापेक्षा जास्त कालावधीच्या भूचुंबकीय मापनांची नोंद आहे.

सदर वेधशाळा पहाण्यास पुर्व परवानगीची आवश्यकता आहे.

छत्रीबाग - 

ही बाग आंग्रेकालीन आहे. या बागेत आंग्रे घराण्यातील पुरूषांच्या स्मृतीनिमित्त बांधलेल्या दगडी समाध्या पडक्या अवस्थेत आहेत. दगडांवरील कोरीव काम मात्र अप्रतिम आहे. 

कान्होजी आंग्रे समाधी -

अलिबाग एस.टी.स्थानकापासून ५ मिनिटांच्या अंतरावर बाजारपेठेकडे जाणार्‍या रस्त्यावर ही समाधी आहे. समाधीच्या आतील भाग अष्टकोनी असून खांबावरील नक्षीकाम अप्रतिम आहे. ज्यांनी हे अलिबाग शहर वसविले त्या दर्यासरखेल कान्होजी आंग्रे यांची ही समाधी आहे. 

आंग्रेवाडा -

एस.टी. स्थानकापासून जवळच विष्णु मंदिरासमोर आंग्रेवाडयाची भव्य इमारत आहे. वाडयात माडीवर दिवाणखाना असून त्यात इतिहासाची साक्ष देणार्‍या वस्तू आढळतात. तसेच कान्हजी आंग्रे यांची गादी व इतर दैवते आहेत.

महाडचे   चवदार    तळे-

महाड हे सावित्री नदीच्या काठावर वसलेले पुरातन कालापसुन प्रसिध्द शहर आहे.

१९२७ साली डॉ. बाबासाहेब अंबेडकरांनी हरीजनांना सार्वजनीक ठिकाणी पाणी भरण्यासाठी व जात पात भेदभाव दुर करण्यासाठी येथील ’’चवदार तळे ’’ या सार्वजनीक पाणवठयावर सत्याग्रह केला होता.

या लढयाच्या स्मृतीमध्ये तेथे ’’क्रांती स्तंभ ’’ उभारण्यात आला आहे.

फणसाड अभयारण्य -

आपल्या देशात बरीचशी अभयारण्ये ही तत्कालीन राजे तसेच संस्थानिक यांनी त्यांच्या शिकारीच्या हौसेकरीता राखून ठेवलेल्या क्षेत्रांपैकी आहेत. नबाब काळातील केसोलीचे जंगल म्हणजेच आताचे फणसाड अभयारण्य ही जंगलसंपत्ती नबाबाचे शिकारक्षेत्र होते. आम जनतेस याठिकाणी शिकार करण्यास बंदी होती. एका बाजूला अरबी समुद्र व दुसर्‍या बाजूला गर्द वनराईने नटलेला डोंगराळ प्रदेश असलेले हे अभयारण्य ५२.७१ चौ.किमी. क्षेत्रात पसरलेले आहे. या अभयारण्यात बिबळया वाघ तरस कोल्हा सांबर भेकर रानडुक्कर पिसोरी ससे साळींदर व दुर्मळ शेकरू आढळतात.

शेकडो प्रकारचे पक्षी फुलपाखरे वनस्पती औषधी झाडे सरपटणारे विविध प्राणी यांनी हे अभयारण्य परिपूर्ण आहे. पर्यावरणीय दृष्टीकोनातून पर्यटनाला प्रात्साहन देण्यासाठी वनखात्यातर्फे सुपेगावजवळ निसर्ग भ्रमणाची सोय करण्यात आली आहे.

अभयारण्यात माहिती केंद्रे असून रहाण्याची सोयही उपलब्ध आहे.

फणसाड धबधबा -

फणसाड धबधबा जाण्यासाठी अलिबाग-मुरूड रोडवर बोर्ली येथे उतरावे लागते. बोर्लीपासून साधारणपणे तीन ते साडेतीन किमी. अंतरावर फणसाड धबधबा आहे. तेथे जाण्यासाठी बोर्लीवरून ३ किंवा ६ आसनी रिक्षांची सोय उपलब्ध आहे. स्वतचे वाहन असेल तर दुचाकी किंवा छोटी गाडी काजूवाडी पर्यंत यावे. तेथूनच समोर फणसाडचा नयनरम्य फेसाळणारा धबधबा दृष्टीस पडतो. काजूवाडीवरून फलवाटेने पाच मिनिटांत धबधब्यापर्यंत पोहोचता येते. निसर्गाच्या कुशीत असलेल्या या धबधब्याचा आनंद फक्त वर्षातूनच घेता येतो. धबधब्याच्या आजूबाजूचा परिसर वन भोजनाचा आंनद घेण्यासाठी अतिशय योग्य आहे.

गारंबीचे   धरण - 

जंजिरा संस्थानाचा पुरोगामी विकास करणार सर सिद्यी अहमदखान यांनी व्हक्टोरिया राणीच्या भारत भेटीची आठवण म्हणून गांरबीच्या जंगलातील धरणास व्हक्टोरिया वॉटर वक्र्स हे नाव दिले. नैसर्गक पाणी अडवून बांधलेले हे धरण मुरूडच्या पूर्वेला जवळपास आठ किमी. अंतरावर असून हे गारंबी धरण म्हणून प्रसिध्द आहे. मुरूड शहरास पिण्याचे पाणी याच ठिकाणावरून पूर्णपणे नैसर्गक प्रवाहाच्या वेगाचा वापर करून पुरविले जाते.

पावसाळयात पर्यटक पाण्याच्या प्रवाहात डुंबण्यासाठी हमखास याठीकाणी येतात. वनभोजनासाठी हे आदर्श ठिकाण आहे. पाण्याच मूळ प्रवाह दूषित न करण्याचे सामंजस्य बाळगून निसर्गाचा आनंद घेण्यास कोणतीच हरकत नाही. दरीत उतरणारी जांभ्या दगडातील पायवाट चहूबाजूस प्रचंड वृक्षराजी मोठे-मोठे खडक वाहत्या पाण्याची गाज पक्षांची किलबील यामुळे पर्यटक गारंबी परिसरात खिळून जातात. (या ठिकाणी प्रवेशासाठी न.पा. मुरूडची परवानगी घेणे आवश्यक आहे.)

नवाबाचा राजवाडा -

मुरूड शहरात प्रवेश करतांना आपले लक्ष वेधून घेतो तो नबाबाचा भव्य राजवाडा. सन १८८५ च्या सुमारास नबाब सदर राजवाडयाची निर्मती करून त्या ठिकाणी रहावयास गेले. राजवाडयाचे वास्तुशिल्प मुघल व गोपिक पध्दतीचे असल्याचे समजते. हा राजवाडा नबाबांची खाजगी मालमत्ता असून तेथे त्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे हा भव्य ऐतिहासिक राजवाडा बाहेरून पहावा लागतो. या ठिकाणाहून मुरूड शहर व भोवतालच्या सागरी परिसराचे विलाभनीय दर्शन होते.

ईदगाह मैदान-

दत्तमंदिरापासून सुमारे दीड किमी अधिक उंचीवर गेल्यास नबाबकालीन इंदगाह दिसतो. ईदगाहवरून सूर्यास्त दिसतोच. परंतू दत्तमंदिराची टेकडी या ठिकाणावरून खूप विलोभनीय भासते.

आजूबाजूस जंगल व उंच डोंगर यामुळे नैसर्गक शांतीची वेगळीच अनुभूती या परिसरात अनुभवण्यास मिळते.

खोकरी घुमट-

सिद्यींचे धर्मगुरू सय्यद अली नजीर व सिध्दी नबाबांच्या काही कबरी खोकरी या ठिकाणी आहेत. खोकरीचे घुमट म्हणून हे ठिकाण पर्यटकांना ठाऊक आहे. इतिहासकाळात दंडा-राजपुरी बंदराजवळचे खोकरी हे एक कमी वस्तीचे गाव होते. भारतीय व अरबी पध्दतीच्या शिल्पकलेचा एक उत्तम प्राचीन नमुना या घुमटांचे शिल्पकाम पहाण्यास चोखंदळ पर्यटक येतात. सिध्दी सिरूलखान सिद्यी खैरियत खान व सिद्यी वाकुतखान यांच्या कबरीसुध्दा याच ठिकाणी आहेत. हे ठिकाण मुरूड आगरदांडा रोडवर मुरूड एस.टी.डेपोपासून जवळपास ६ किमी. अंतरावर आहे.

कुडेलेणी - 

कुडे मांदाड ही बौध्दकालीन लेणी खाजगी भालगाव पुलामुळे मुरूड शहरापासून दक्षिणेस केवळ २५ किमी. अंतरावर आहेत. मुंबई-गोवा हाय वे वरील माणगांवपासून २१ किमी वर हे गाव राजपूरी खाडीच्या मांदाडउपखाडीवर असून या गावाच्या पूर्वेकडील महोबा डोंगरावर ही लेणी आहेत. ही लेणी पहाण्यास स्वतचे वाहन असेल तर थेट लेण्यांपर्यंत पोहचता येते.

इ.स.पूर्व १०० वर्षाच्या काळात दंडा राजपुरी येथे सातवहनांचे सामंत महाभोज याची राजधानी होती. त्यांनी बौध्द भिक्षुकांच्या वास्तव्यासाठी खोदलेली ही लेणी समुद्रसपाटीपासून २०० फुट उंच असून एका डोंगर रांगेत इस १८४८ साली डोंगराच्या कपारीतील या लेण्यांचा शोध लागला. रौद्र कातकाळातील ही २६ लेणी दोन स्तरांत असून लेणी क्र. १ ते १५ खालच्या रांगेत व लेणी क्र. १६ ते २६ वर आहेत. यात ५ चैत्य व २१ विहार असून त्यात ब्राम्ही लिपीतील प्रकृत व संस्कृत शिलालेख आहेत. आत एक भव्य स्तूप आहे. लेण्यांच्या सुरूवातीला असलेले खांबदेखील खूप देखणे असून येथील पाण्याची टाकीही पाहण्यासारखी आहेत.

हा सगळा परिसर पश्चिमाभिमुख असून येथून समोर अथांग अरबी समुद्र पूर्वेस तळा उत्तरेस घोसाळा किल्ला दिसून येतो. शतकानुशतके समुद्रावरून येणारे जोरदार वारे नैरुत्य मान्सुन पावसाचे तडाखे यांना ही लेणी तोंड देत असल्यामुळे काळाच्या प्रवाहात काही शिलालेख व प्रतिमा झिजून अस्पष्ट झाल्या आहेत. तरीदेखील बरेच शिलालेख अजूनही वाचता येतात. ही लेणी म्हणजे भिक्षुकांचे ध्यानधारणा व निवास करण्याचे एकांतातील अतिशय निसर्गरम्य परिसर असलेले त्याच काळातील मोठे स्थान असावे असे वाटते. एससंध दगडी डोंगर कोरून निर्माण झालेल्या लेणी पहाताना पहाणार्‍याच्या चेहर्‍यावर आश्चर्यमिश्रीत भाव सहज उमटतात.

सवतकडा धबधबा -

मुरूंड शहराजवळ गारंबी धरणाकडे जावे. या गावातून सायगावमार्गे सवतकडा धबधब्यावर जाता येते. धबधब्यापर्यंत गाडी जाऊ शकत नाही. पायवाटेने डोंगर व शेतातून वनश्रीचा आनंद घेत चालत अर्ध्या तासात धबधब्यापर्यंत पोहचता येते.

पावसाळयात हा जलप्रपात इतका प्रचंड असतो कि थेट पाण्याखाली जाणे अशक्यच. टेंकग वगैरे करणार्‍या साहसी पर्यटकांसाठी मात्र आदर्श ठिकाण आहे.

सामान्य निसर्गप्रेमी पर्यटक मात्र नंतर हिवाळयापर्यंत धबधब्याचा आंनद घेऊ शकतो. जानेवारीनंतर पाण्याचा झोत कमी होत जाऊन धारा बारीक होतात.

धबधब्यावर महालोर गाव आहे. फार पूर्वी गुरे चरायला घेऊन जाणार्‍या दोन सवती याठिकाणी एकमेकींचा काटा काढतांना सोबत पडून मृत्यू पावल्या. त्यामुळे यास सवतकडा नाव पडले अशी दंतकथा आहे. इथला निसर्गमात्र वेगळया विश्वात निश्चंत खिळवून ठेवतो.

 

घारापुरी (एलिफंटा) गुंफा -

घारापुरी (एलिफंटा) गुंफा या रायगड जिल्ह्या मधील असलेले व पर्यटकांमध्ये अत्यंत प्रसिध्द असलेले असे हे ठिकाण आहे. घारापुरी (एलिफंटा) गुंफा या समुद्रामध्ये असलेल्या एका सदा हरित बेटावर साधारणपणे ७ व्या शतकापासुन अस्तित्वात असलेले एक आश्चर्यच म्हणावे लागेल. अत्यंत काळजीपर्वक कातळा मध्ये कापुन बांधलेल्या या गुंफा श्री शंकराला समर्पित आहेत.

येथील जगप्रसिध्द 'महेश मुर्ति' ही शिवाच्या 'निर्माता, रक्षणकार्ता व संहारक' या तीन विविध अंगाची महाती सांगणारी आहे.

 

मुंबई येथील 'गेट वे ऑफ इंडिया' येथुन रोज घारापुरी (एलिफंटा) गुंफा येथे जाण्यासाठी होडीची सेवा असते

घारापुरी (एलिफंटा) गुंफा या दर्शनास दर सोमवारी बंद असतात.

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.