महाराष्ट्राची प्राकृतिक रचना:
महाराष्ट्राचा बहुतांशी भाग ज्वालामुखी निर्मित बेसॉल्ट या खडकाचा बनलेला आहे. राज्यात जुने अनावृत्त खडक वैनगंगेच्या खो-यात आहेत.त्यानंतर विदर्भ व शेवटी तापी खोरे असा क्रम लागतो. प्राकृतिक दृष्ट्या महाराष्ट्राचे प्रमुख तीन विभाग पडतात : (१) पश्चिमेकडील कोकणची किनारपट्टी, (२) सह्याद्रीच्या रांगा व (३) पूर्वेकडील पठारी प्रदेश.
पश्चिमेकडील कोकणची किनारपट्टी :
उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल खाडीपर्यंतच्या चिंचोळ्या व सपाट भूप्रदेशाला कोकण असे म्हणतात. कोकणपट्टीचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग केले जातात. या किनारपट्टीच्या पश्चिमेस अरबी समुद्र, तर पूर्वेस सह्याद्रीची रांग आहे. किनारपट्टीची एकूण दक्षिणोत्तर लांबी ७२० किमी. व रुं दी ४० ते ८० किमी. आहे.उत्तरेकडे उल्हास नदीच्या खोऱ्यात रुंदी सर्वात जास्त म्हणजे १०० किमी. पर्यंत आहे. दक्षिणेकडे मात्र रुंदी कमी होत जाते. सह्याद्रीच्या रांगेमुळे कोकणपट्टीची रुंदी मर्यादित झाली आहे. हा भाग सपाट नसून बराचसा उंचसखल व खडबडीत आहे. सह्याद्रीच्या तीव्र उतावरून द्रुतगतीने वाहत येणाऱ्या नद्यांनी किनारपट्टीवर खोल चर पाडलेले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर झीज झालेल्या उभ्या आडव्या डोंगररांगांनी हा प्रदेश व्यापलेला आहे.
कोकणच्या किनारपट्टीची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत असून ती साधारणपणे १५ मी. पासून २७५ मी. पर्यंत आढळते. अगदी पश्चिमेकडील अरबी समुद्रलगतच्या सखल भागाची समुद्र सपाटी पासून उंची फारच कमी असून या भागाला ‘खलाटी’ असे म्हणतात. तेथून पूर्वेकडील डोंगराळ भागाला ‘वलाटी’ असे म्हणतात. यानंतर सह्याद्रीच्या रांगेची सुरुवात होऊन त्याची उंची द्रुतगतीने वाढत जात असलेली दिसते. किनारपट्टीवर काही ठिकाणी कमी उंचीचे व जांभा खडकांचे पठारी भाग, तर नदीमुखांच्या प्रदेशात मैदाने आढळतात (किनारपट्टीचा, विशेषतः दक्षिणेकडील, भाग जांभ्या मृदेने व्यापला असून तेथे समुद्र सपाटी पासून सरासरी ७५ मी. उंचीचे पठारी भाग आढळतात). किनाऱ्यालगत मुरुड,जंजिरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग यांसारखे जलदुर्ग आहेत. कमी उंचीचे भाग नद्यांच्या गाळाने भरून आलेले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर लहानमोठी बरीच बंदरे असून फार पूर्वीपासून व्यापाराच्या दृष्टीने ही बंदरे प्रसिद्ध आहेत. प्राचीन व मध्ययुगीन काळातही येथून अरबस्तान,ईजिप्त, ग्रीस, रोम यांच्याशी व्यापार चाले.कोकण किना-यावर सर्वाधिक किनापट्टी लाभलेला जिल्हा (२४०कि.मी.) रायगड असून मासेमारीत आघाडीवर आहे .महाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनापैकी खा-या पाण्यातील मासेमारी मुंबई येथे करण्यात येते. राज्यातील पहिले मत्स्यालय तारपोरवाला (मुंबई)येथे आहे.कोकण किना-याजवळील तेल क्षेत्र बॉम्बे हाय व वसई हाय हे आहेत .कोकणातील नैसर्गिक वायुवर आधारीत औष्णिक विद्युत प्रकल्प उरण (रायगड) आहे.
कोकण किना-यावरील बेटे – मुंबई, साष्टी, खंदेरी-उंदेरी, घारापूरी , अंजदिव, कुरटे, जंजिरा
कोकण किना-यावरील प्रमुख खाड्या – वसई, ठाणे , धरमतर, महाड, चिपळूण, दाभोळ, जयगड, राजापूर व विजयदुर्ग, दातीवरा मनोरी, मालाज, माहिम, पनेवेल, बालकोट.
नोट : भरतीच्या वेळी नदी मुखातून समुद्राचे पाणी जेथपर्यंत नदीत शिरते त्या नदीच्या भागास खाडी म्हटले जाते .
महाराष्ट्रातील प्रमुख खाड्या
खाडी नदी जिल्हा
दातीवरे तानसा, वैतरणा ठाणे
वसई उल्हास ठाणे
ठाणे उल्हास ठाणे
मनोरी दहिसर मुंबई उपनगर
मालाड --- मुंबई उपनगर
माहीम माहीम मुंबई शहर
पनवेल --- रायगड
धरमतर पाताळगंगा रायगड
राजपुरी --- रायगड
बाणकोट सावित्री रायगड
केळशी भारजा रत्नागिरी
दाभोळ - वाशिष्टी - रत्नागिरी
जयगड - शास्त्री - रत्नागिरी
भाट्ये - काजळी - रत्नागिरी
पूर्णगड - मुचकुंदी - रत्नागिरी
जैतापूर - काजवी - रत्नागिरी
विजयदुर्ग - शुक - रत्नागिरी
देवगड - देवगड - सिधुदुर्ग
आचरा - आचरा - सिंधुदुर्ग
कालावाली - गड - सिधुदुर्ग
कर्ली - कर्ली - सिंधुदुर्ग
कोकण किना-यावरील प्रमुख नद्या – उल्हास ,वैतरणा , सावित्री , वशिष्टी, शास्त्री , तेरेखोल
कोकण किना-यावरील प्रमुख किल्ले – वसई ,जंजिरा ,सुवर्णदुर्ग , विजयदुर्ग , आणि सिंधुदुर्ग
महाराष्ट्रातील महत्वाचे किल्ले
किल्ला जिल्हा
ब्रह्मगिरी नाशिक
साल्हेर मुल्हेर नाशिक
अंकाई टंकाई नाशिक
हरिश्चंद्रगड अहमदनगर
रतनगड अहमदनगर
रायगड रायगड
कर्नाळा रायगड
प्रबळगड रायगड
सरसगड रायगड
लिंगाणा रायगड
सुधागड रायगड
सिंहगड पुणे
पुरंदर पुणे
शिवनेरी पुणे
लोहगड पुणे
राजमाची पुणे
रोहिडेश्वर पुणे
विसापूर पुणे
राजगड पुणे
तोरणा पुणे
प्रतापगड सातारा
मकरंदगड सातारा
सज्जनगड सातारा
वासोटा सातारा
वसंतगड सातारा
पन्हाळा कोल्हापूर
विशाळगड कोल्हापूर
दौलताबाद औरंगाबाद
गाविलगड अमरावती
नर्नाला अकोला
कोकण किना-यावरील प्रमुख बंदरे – रायगड जिल्यात तयार करण्यात आलेले अत्याधुनिक बंदर जवाहरलाल नेहरु (न्हावाशेवा) कॅनडा च्या मदतीने तयार करण्यात आला . महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मुंबई हे एक नैसर्गिक बंदर आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे बंदर आहे. मुंबई ताण कमी करण्याच्या दृष्टीने न्हावाशेवा हे अत्याधुनिक बंदर आहेत.,अलिबाग ,मुरुड, श्रीवर्धन , जयगड , रत्नागिरी , मालवण , वेंगुर्ला . कोकण किना-यावर आसणारी एकूण बंदरे ४९ आहेत .
सह्याद्रीच्या रांगा :
महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील ही सह्याद्रीची रांग कोकणच्या किनारपट्टीला जवळजवळ समांतर अशी उत्तर-दक्षिण पसरलेली आहे. तिला पश्चिम घाट असेही म्हणतात. राज्याच्या उत्तर सीमेपासून ते दक्षिणेस राज्याच्या सीमा ओलांडून कर्नाटक, केरळपर्यंत सह्याद्रीच्या रांगा पसरलेल्या आढळतात. सह्याद्रीमुळेच महाराष्ट्राचे कोकण व देश (पश्चिम महाराष्ट्र) हे दोन स्वाभाविक विभाग निर्माण झाले असून कोकण व पठारावरील नद्यांच्या हाच प्रमुख जलविभाजक आहे. पर्वताच्या उभय बाजूंना भूरचनेची दोन भिन्न स्वरूपे आहेत. पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असून तेथे लाव्हा खडकांच्या थरांचे काळे व उघडे कडे सर्वत्र दिसतात. अधूनमधून झीज होऊन निर्माण झालेले उघडे व वनाच्छादित असे पर्वतांचे अवशिष्ट उतारही पहावयास मिळतात. या पश्चिम उतारावर नद्यांनी खोल दऱ्यातयार केल्या आहेत. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याकडे कोकणची किनारपट्टी आहे. पर्वताचा पूर्व उतार मात्र बराच मंद असून तो पूर्वेकडील पठारात विलीन होतो.
सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून पूर्वेकडे अनेक फाटे फुटलेले असून त्यांतील उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे सातमाळा−अजिंठा डोंगररांगा,हरिश्चंदगड, बालाघाट डोंगररांगा व महादेवाचे डोंगर प्रमुख आहेत. पठारावरील नद्यांचे हे दुय्यम जलविभाजक ठरतात. सह्याद्रीची उंची सामान्यपणे ९१५ ते १,२२० मी. असून उत्तरेकडे ती अधिक व दक्षिणेकडे कमी आढळते.सह्याद्रीत काही ठिकाणी सपाट माथ्याचे पठारासारखे भाग आढळतात, त्यांना घाटमाथा असे म्हणतात. कोकण व देश यांना जोडणारे अनेक घाट या प्रदेशात आहेत; त्यांवरून याला घाटमाथा असे म्हटले जात असावे. भीमाशंकर, महाबळेश्वर, पाचगणी यांसारखी स्थळे अशाच भागावर आहेत. सह्याद्री व त्याच्या निरनिराळ्या डोंगररांगांच्या माथ्यावर ऐतिहासिक दृष्टया अत्यंत महत्त्वाचे ठरलेले अनेक डोंगरी किल्ले आहेत. नासिक-अहमदनगर जिल्हांच्या सीमेवर असलेले कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर (उंची १,६४६ मी.) आहे. याशिवाय साल्हेर (१,५६७ मी.), महाबळेश्वर (१,४३८ मी.),सप्तशृंगी (१,४१६ मी.), त्र्यंबकेश्वर (१,३०४ मी.) ही सह्याद्रीतील इतर महत्त्वाची उंच ठिकाणे आहेत.
| क्र. | शिखर | उंची (मी.) | जिल्हा व वैशिष्ट्य |
| १ | कळसूबाई | १६४६ | नाशिक व अहमदनगरच्या सीमेवर (अहमदनगर) |
| २ | साल्हेर | १५६७ | नाशिक व महाराष्ट्रातील द्वितिय क्रमांकाचे |
| ३ | महाबळेश्वर | १४३८ | सातारा |
| ४ | हरिश्चंद्र गड | १४२४ | अहमदनगर |
| ५ | सप्तश्रृंगी गड | १४१६ | नाशिक |
| ६ | तोरणा | १४०४ | पुणे |
| ७ | अस्तंभा | १३२५ | नंदुरबार |
| ८ | त्रंबकेश्वर | १३०४ | नाशिक |
| ९ | तौला | १२३१ | नाशिक |
| १० | वैराट | ११७७ | अमरावती |
| ११ | चिखलदरा | १११५ | अमरावती |
| १२ | हनुमान | १०६३ | धुळे |
सह्याद्री श्रेणी बरीचशी सलग असली, तरी तीमध्ये अधूनमधून खिंडी किंवा घाटही असलेले आढळतात. थळ, माळशेज, बोर, वरंधा, आंबेनळी, कुंभार्ली, आंबा, फोंडा, बावडा , आंबोली इ. घाटांनी देश व कोकण एकमेकांना जोडले आहेत. या दोन प्रदेशांतील वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने या घाटांना पूर्वीपासून महत्त्व आहे. मुंबई-नासिक महामार्गावरील कसारा येथील थळघाट व मुंबई-पुणे मार्गावरील लोणावळ्याजवळील बोरघाट यांद्वारे महाराष्ट्राचा पूर्व भाग मुंबईशी रस्ते व लोहमार्गाने जोडला गेला आहे.
सह्याद्रीतील प्रमुख घाट:
उंच व लांबलचक पर्वतरांगात कमी उंचीच्या भागास घाट किवा खिंड म्हणतात. या खिंडीतून दळणवळणाचे मार्ग नेले जातात, या ठिकाणाला घाट म्हणतात.सह्यांद्री पर्वतात पुढीलप्रमाणे घाट आहेत .
| घाट | लांबी | जोडलेली शहरे |
| थळघाट (कसारा) | ७ | नाशिक-मुंबई (महामार्ग क्र.-३) |
| बोरघाट | १५ | पुणे-मुंबई (महामार्ग क्र.-४) |
| आंबाघाट | ११ | रत्नागिरी-कोल्हापूर |
| फोंडाघाट | ९ | कोल्हापूर-गोवा |
| आंबोली (रामघाट) | १२ | सावंतवाडी (सिंधूदुर्ग) – कोल्हापूर, बेळगाव |
| खंबाटकी (खंडाळा) | | पुणे-सातारा-बंगलोर |
| कुंभार्ली घाट | | चिपळूण (रत्नागिरी)-कराड |
| वरंधा घाट | ६ | भोर-महाड |
| दिवा घाट | | पुणे-सासवड मार्गे बारामती |
| माळ्शेज घाट | | आळेफाटा (पुणे)-कल्याण |
| नाणेघाट | १२ | अहमदनगर-मुंबई |
| पारघाट | १० | सातारा-रत्नागिरी |
| रणतोंडी घाट | | महाड-महाबळेश्वर |
| पसरणी घाट | | वाई-महाबळेश्वर |
| चंदनपूरी घाट | | नाशिक-पुणे |
| आंबेनळी | | महाबळेश्वर-पोलादपूर |
| ताम्हणी | | रायगड-पुणे |
दख्खनचे पठार :
सह्याद्रीच्या पूर्वेस विस्तृत असा पठारी प्रदेश पसरलेला असून त्याला देश म्हणूनही ओळखले जाते. राज्याच्या जवळजवळ नऊ-दशांश भाग या पठाराखाली मोडतो. दख्खनच्या पठाराचा बराचसा भाग महाराष्ट्रात येत असून त्याला महाराष्ट्र पठार असेही संबोधले जाते. पश्चिमेस सह्याद्रीच्या पूर्व उतारापासून ते विदर्भाच्या अगदी पूर्व भागातील सूरजगड, भामरागड व चिरोली टेकड्यांपर्यंत सु. ७५० किमी. व उत्तरेकडील सातपुडा पर्वतापासून दक्षिणेस कोल्हापूर जिल्हापर्यंत सु. ७०० किमी. पर्यंत महाराष्ट्राचे पठार पसरले आहे. मुंबईसभोवतालच्या भागात या पठाराची जाडी अधिक आहे. पठाराची पश्चिम बाजू काहीशी उंचावलेली असून प्रदेशाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे व आग्नेयीस बंगालच्या उपसागराकडे असलेला दिसतो. पश्चिमेकडील सरासरी उंची ६०० मी. असून पूर्वेकडे वैनगंगा खोऱ्यात ती ३०० मी. पर्यंत कमी होत गेलेली आढळते.
महाराष्ट्राच्या पठारावर ठिकठिकाणी भूमिस्वरूपांची स्थानिक वैशिष्ट्ये आढळतात. पठारावर सह्याद्रीच्या अनेक रांगा पसरलेल्या आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना अनुक्रमे सातपुडा पर्वत, तापी−पूर्णेचे खोरे, सातमाळा−अजिंठा डोंगररांगा, गोदावरी खोरे, हरिश्चंद्रगड, बालाघाट डोंगररांगा, भीमा खोरे, महादेवाचे डोंगर व शेवटी दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे अशी या पठारी प्रदेशाची भूरचना आहे. पूर्वेकडे पसरलेल्या डोंगरफाट्यांचे प्रारंभ सह्याद्रीत होत असून त्या पश्चिम वायव्येकडून पूर्व आग्नेयीकडे पसरलेल्या आहेत. यांचे उत्तर उतार तीव्र व दक्षिण उतार मंद आहेत. तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा या नदीखोऱ्यांनी ह्या डोंगररांगा एकमेकींपासून अलग केलेल्या आहेत. हा संपूर्ण प्रदेश लाव्हारसापासून तयार झालेल्या अग्निजन्य बेसाल्ट खडकांनी बनलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्हे याच पठारी प्रदेशात येतात. पठारावर सपाट माथ्याचे डोंगर व टेकड्या हे भूविशेष आढळतात. डोंगरांच्या मुख्य रांगांना किंवा अन्य भूमिस्वरूपांना त्या त्या भागात स्थानिक नामाभिधाने देण्यात आली आहेत.
| थंड हवेचे ठिकाण | जिल्हा | थंड हवेचे ठिकाण | जिल्हा |
| तोरणमाळ | नंदुरबार | पाचगणी | सातारा |
| खंडाळा | पुणे | माथेरान | रायगड |
| रामटेक | नागपूर | चिखलदरा (गाविलगड) | अमरावती |
| महाबळेश्वर | सातारा | लोणावळा, भिमाशंकर | पुणे |
| जव्हार | पालघर | मोखाडा, सुर्यामाळ | ठाणे |
| आंबोली | सिंधुदुर्ग | येड्शी | उस्मानाबाद |
| पन्हाळा | कोल्हापूर | म्हैसमाळ | औरंगाबाद |
दख्खनवरील प्रमुख पठारे
पठार जिल्हा
अहमदनगर अहमदनगर
सासवड पुणे
औध सातारा
पाचगणी सातारा
खानापूर सांगली
मालेगाव नाशिक
बुलढाणा बुलढाणा
तोरणमाळ नंदुरबार
महाराष्ट्र पठाराची निर्मिती -
महारष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेली आहे .७० दशलक्ष वर्षापूर्वी दख्खनच्या प्रदेशास भूपृष्टावर प्रचंड भेग पडून भ्रशमुलक झाला आणि लाव्हारसाचे संचयन झाले. लाव्हारसापासून महाराष्ट्र पठार तयार झाल्याने त्यास दाखखन लावा असेही म्हणतात. लाव्हारसाचे २९ वेळा संचयन होऊन सर्तेशेवटी पठार तयार झाले. हा लाव्हारस प्रामुख्याने बेसिक प्रकारचा आहे. दख्खनच्या पठाराच्या पश्चिम बाजूस विस्तीर्ण कडा आहेत आणि त्यापासून पश्चिम घाताची निर्मिती झाली .
दख्खनची पठारे -
बालाघाट-अहखानपूर,मदनगर, सासवडचे पठार, औंध पठार, खानपूर जत- पठार, बुलढाणा पठार, मालेगाव पठार, मांजरा पठार, तोरणमाळ पठार, इत्यादी पठारांचा समावेश होतो
दख्खनच्या पठारावरील खोऱ्यांचा प्रदेश -
महाराष्ट्राच्या पठारावरील प्रदेश हा मुख्यत्वेकरून नद्यांच्या खोऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.महाराष्ट्र पठारावर उत्तरेकडून दक्षिणेकडे आल्यास तापी पूर्णा खोरे, गोदावरी खोरे , प्राणहिता खोरे, भीमा खोरे, कृष्णा खोरे पहावयास मिळतात.
तापी - पूर्णा खोरे :
विशेषता भुरचनेच्या दृष्टीने पाहता महाराष्ट्रातील गोदावरी, भीमा, कृष्णा नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. उत्तरेस तापी पूर्णा खोरे मध्य प्रदेशाकडून सातपुडा पर्वतरागामुळे पठाराच्या इतर भागापासून वेगळे झालेले आहे. तापी पूर्णा हा खचदरीचा प्रदेश आहे. पश्चिमेकडे ते गुजरातच्या मैदानाकडे उतरत जाते . तर पूर्वेस साधारण प्रतीच्या जलविभागामुळे वर्धा नदीपासून वेगळे झाले आहे. तापी पूर्णा नदीचा खोऱ्याचा प्रदेश उत्तरेकडे व दक्षिणेकडे सातपुडा पर्वत व सातमाळा अजिंठा डोंगररांगांनी मर्यादित झालेला आहे. मध्य प्रदेशात सातपुडा पर्वत रांगामध्ये तापी नदी उगम पावते आणि पश्चिमेकडे वाहत जात असते
गोदावरी खोरे :
महाराष्ट्राचे सर्वात जास्त विस्ताराचे गोदावरी खोरे आहे. सातमाळा अजिंठा डोंगररांगामुळे गोदावरी खोरे तापी खोरयापासून अलग झालेले आहे. तर दक्षिणेकडील बालाघाट डोंगररांग ही भीमा खोरयापासून गोदावरी खोरे अलग करते. गोदावरी खोऱ्याचा पश्चिमेकडील अरुंद आहे. जसजशी नदी पूर्वेकडे वाढत जाते तसतसा मात्र रुंद होत जातो.
खोऱ्यांची सर्वसाधारण उंची ३०० ते ५५० मी आहे. खोऱ्याचा आकार नरसाळा प्रमाणे दिसतो.
प्राणहिता खोरे :
विदर्भाच्या पूर्वेकडील भाग वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, व प्राणहिता या नद्यांचा खोऱ्यानी व्यापलेला आहे. या प्रदेशाचा सर्वसाधारण दक्षिण दिशेने आहे.
भीमा खोरे :
भीमा ही कृष्णा नदीची उपनदी असली तरीही महाराष्ट्रात संपूर्णपणे स्वतंत्ररीत्या भीमा नदी वाहते. म्हणून भीमा खोऱ्याचा स्वतंत्र केला जातो. ती सह्यान्द्री मध्ये भीमाशंकर येथे सुमारे ५०० कि मी पूर्वेस वाहत जाते. कर्नाटकात कृष्णा नदीस मिळते. भीमा नदीच्या खोर्याचे क्षेत्र मध्य महाराष्ट्रात पसरलेले आहे. उत्तरेस हरिश्चंद्र बालाघाट दक्षिणेस शंभू महादेव डोंगररांग यामुळे भीमा खोरे मर्यादित झालेले आहे. भीमेला घोड, सीना, तसेच मुळा, नीरा व मन नद्या मिळतात.या खोऱ्याच्या पश्चिमेस सह्यान्द्री पर्वत व पायथ्यालगत मावळ प्रदेश आहे. भीमा नदीचे खोरे मध्य महाराष्ट्रात पसरलेले आहे .
कृष्णा खोरे :
कृष्णा खोऱ्याचे सर्वात कमी क्षेत्र आहे. कृष्णा खोऱ्याने राज्याचा दक्षिण भाग व सह्यांद्रीच्या पूर्व भाग व्यापलेला आहे .कृष्णा खोऱ्याची मर्यादा पश्चिमेस सह्यान्द्री पर्वत व पूर्वेस शंभू महादेव रांगांनी निश्चित झालेली आहे .
महाराष्ट्रातील खडक आणि त्यांचा इतिहास
भारतीय उपखंडाचे जे तीन प्राकृतिक विभाग आहेत, त्यांपैकी द्वीपकल्प ह्या विभागात महाराष्ट्र राज्य येते. साहजिकच भूवैज्ञानिक संरचना,भूमिरूपविज्ञान (भूमिरुपांची वैशिष्ट्ये, उत्पत्ती व विकास ह्यांचे अध्ययन) व भूवैज्ञानिक इतिहास ह्या संबंधात भारतीय द्वीपकल्पाची असणारी सारी वैशिष्ट्ये महाराष्ट्रातसुद्धा दिसून येतात महाराष्ट्राचा बराचसा भूभाग हा ज्वालामुखींपासून बनलेल्या बेसाल्टी लाव्ह्यांच्या थरांनी-काळ्या पत्थरांनी-व्यापलेला असून ते महाराष्ट्राचे खास भूवैज्ञानिक वैशिष्ट्य आहे.निरनिराळ्या भूवैज्ञानिक कालखंडांमद्ये निर्माण झालेले खडक कोठे कोठे सापडतात व त्यांच्या अभ्यासातून कोणकोणते भूवैज्ञानिक निष्कर्ष निघतात, ह्याचा अभ्यास म्हणजेच एखाद्या भागाचा भूवैज्ञानिक इतिहास होय.
आर्कीयन खडक :
आर्कीयन (आर्ष) महाकल्पात तयार झालेले खडक महाराष्ट्रात फारच थोड्या क्षेत्रात सापडतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेकडील अगदी थोडासा भाग ह्या महाकल्पात निर्माण झालेल्या खडकांनी व्यापलेले असून नागपूर−भंडारा जिल्ह्यांमध्येही काही भागांत आर्कीयन काळातील खडक सापडतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडणारे खडक हे धारवाडी संघाच्या गोव्यामध्ये आढळणाऱ्या कॅसलरॉक पट्ट्याचे उत्तरेकडील टोक असून अलीकडेच त्यांना ‘बांदा माला’ असे नाव देण्यात आले आहे, तर विदर्भातील नागपूर-भंडारा भागामध्ये सापडणारे खडक मध्य प्रदेशातील चिल्पी घाट पट्ट्याचा पश्चिमेकडील विस्तार आहे. याचे महाराष्ट्रामध्ये आल्यावर विभाजन होते व नागपूरकडील पट्ट्यास ‘सौसर माला’, तर भंडाऱ्याकडील पट्ट्यास ‘साकोली माला’ असे नाव आहे. बांदा, सौसर आणि साकोली या मालांमध्ये रुपांतरित (दाब व तापमान यांमुळे बदल घडून आलेले) खडक सापडतात. यांमध्ये मुख्यत्वेकरून फायलाइट, क्वॉर्ट्झाइट, अभ्रकी सुमाजा (सहज भंगणारा खडक) इ. खडकांचा समावेश आहे. मुळातले अवसादी (गाळाचे) खडक सागरी क्षेत्रात तयार झालेले असल्याने आर्कीयन कालखंडातील सागरी क्षेत्राचा विस्तार कुठपर्यंत झाला असावा, ही कल्पना येण्यास ह्या खडकांचा उपयोग होतो. या खडकांची निर्मिती होताना भूकवच आजच्याइतके जाड नव्हते त्यामुळे ह्या अवसादी खडकांमध्ये अनेक वेळा लाव्ह्याचे अंतःस्तरण झाले (थरांमध्ये थर तयार झाले). अवसादी खडकांचे रूपांतर होताना लाव्ह्यापासून निर्माण झालेल्या खडकांचेही रूपांतरण होऊन मेटॅडोलेराइट,अँफिबोलाइट इ. खडकांची निर्मिती झाली. हे खडक शेवटी गिरिजनक (पर्वतनिर्मितीच्या) हालचालींमुळे उचलले जाऊन त्यांचे घड्यांचे पर्वत बनले व त्यांचे सागरी क्षेत्रातून जमिनीत परिवर्तन झाले; पण ह्याचमुळे त्यांची रचना अतिशय गुंतागुंतीची झाली व त्यांत शिलारसाची अंतर्वेशने (घुसण्याच्या क्रिया) होऊन ग्रॅनाइट, गॅब्रो इ. अग्नज खडकांची निर्मिती झाली. बांदा, सौसर व साकोली मालांमधील खडकांमध्ये लोह व मँगॅनीज ह्यांच्या धातुकांचे (कच्च्या रुपातील धातूंचे) साठे सापडतात. (यवतमाळ जिल्ह्याच्या आग्नेय भागात व नांदेड जिल्ह्याच्या पूर्व भागामध्येही ह्याच कालखंडामध्ये तयार झालेले ग्रॅनाइट व पट्टिताश्म अस्तित्वात आहेत. )
सुपुराकल्प काळ :
सुपुराकल्पामध्ये [आर्कीयननंतर ते सु. ६० कोटी वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळामध्ये] तयार झालेले खडकही असेच अगदी फार लहान क्षेत्रात आढळतात. कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी भागात व फोंडा घाट भागात पिंडाश्म, वालुकाश्म, शेल इ. खडकांनी बनलेला भाग आहे. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात आढळणाऱ्या कलादगी मालेचेच हे भाग आहेत. असे मानतात. आंध्र प्रदेशातील कडप्पा संघाचे हे खडक समतुल्य आहेत. ह्यांचेच समतुल्य खडक म्हणजे आंध्र प्रदेशातील पाखाल मालेचेखडक होत. पाखाल मालेच्या खडकांपैकी काहींनी आंध्र प्रदेशालगतच्या सिरोंचा भागातील थोडे क्षेत्र व्यापले आहे. यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यांत अगदी लहान क्षेत्रात चुनखडी, वालुकाश्म, शेल इ. खडकांनी बनलेल्या शैलसमूहास ‘सुलावाई माला’ असे नामाभिधान आहे. ही माला सुपुराकल्पातील पण विंध्य संघाशी समतुल्य आहे, असे मानतात; पण हेही खडक पाखाल मालेतीलच असावेत, असा तर्क काही भूवैज्ञानिकांनी अलीकडच्या काळामध्ये केला आहे.
पुराजीव महाकल्प काळ :
पुराजीव महाकल्पाच्या (सु. ६० ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या कालाच्या) फार मोठ्या कालखंडामध्ये भारतीय द्वीपकल्पामध्ये खडकांची निर्मिती फारशी झालीच नाही, असे म्हटले तरी चालेल.
पर्मियन कालखंड :
पर्मियन (सु. २७ ते २४.५ कोटी वर्षापूर्वीच्या) कालखंडाच्या सुरुवातीला एक फार मोठे हिमयुग होऊन गेले व त्या वेळच्या हिमनद्यांच्या तोंडाशी हिमानी अवसाद (गाळ) सापडतात. त्यांचे दृश्यांश (भूपृष्ठावर उघडे पडलेले भाग) इतरत्र खूप असले, तरी महाराष्ट्रात त्यांचा आढळ केवळ कामठी कोळसा क्षेत्राच्या परिसरातील फक्त तीन छोट्या दृश्यांशांच्या रुपात अपवादात्मक रीतीनेच होतो.
ह्या हिमानीअवसादांच्या निर्मितीनंतर काही विशिष्ट क्षेत्रात खचदऱ्या [खंदकासारख्या आकाराच्या दऱ्या; ] निर्माण होऊन त्यांत नादेय व सरोवरी (नदीमुळे व सरोवरात बनलेल्या) अवसादांचे शैलसमूह तयार झाले. हिमानी अवसाद व त्यानंतर येणारे हे नादेय आणि सरोवी अवसाद ह्यांच्या शैलसमूहास असे नाव आहे. गोंडवनी संघाची कालमर्यादा बरीच मोठी म्हणजे पर्मियनपासून पूर्व क्रिटेशसपर्यंत (सु. २७ ते १४ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत) आहे. गोंडवनी संघाचे खडक महाराष्ट्रात नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत असून त्यांमध्ये दगडी कोळशांचे साठे सापडतात.
मध्यजीव महाकल्प कालखंड :
मध्यजीव महाकल्पातील (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) क्रिटेशस कालखंड हा सागरी अतिक्रमणांचा कालखंड म्हणून प्रसिद्ध आहे. नर्मदा नदीच्या खोऱ्यात मध्य प्रदेश व गुजरात ह्या राज्यांत नर्मदेच्या उत्तरेस अशा अतिक्रमणांमुळे तयार झालेले सागरी खडक सापडतात व त्यास बाघ थर म्हणतात. बाघ थरांचे काही दृश्यांश नर्मदा नदीच्या दक्षिणेस धुळे जिल्ह्यातील अक्कलकुआ भागामध्ये सापडतात.
बाघ थरांच्या निर्मितीनंतर, परंतु क्रिटेशस कालखंडामध्येच विदर्भ आणि लगतच्या मध्य प्रदेशाच्या भागामध्ये विस्तृत अशा सपाट, मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली व तेथे गोड्या पाण्यातील वालुकामय चुनखडकांची निर्मिती झाली. हे चुनखडक महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात येथे आढळतात व त्यांना लॅमटा माला म्हणतात. लॅमेटा मालेच्या खडकांमध्ये जबलपूर व पिसदुरा येथे सापडणाऱ्या डायनोसॉर या प्रचंड सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जीवाश्मांचे (शिळारूप अवशेषांचे) साम्य ब्राझील व मॅलॅगॅसी येथे सापडणाऱ्या तत्कालीन खडकांच्या जीवाश्मांशी असल्याने खंडविप्लषाच्या कल्पनेस पुष्टी मिळते. लॅमेटा मालेतील खडकांचे दृश्यांश मात्र त्यावर येणाऱ्या दक्षिण ट्रॅपच्या भूभागाच्या सीमेपुरते मर्यादित आहेत.
मध्यजीव महाकल्प कालखंड :
मध्यजीव महाकल्पाच्या शेवटी शेवटी द्वीपकल्पातील जमिनीस लांबच लांब अशा भेगा पडून त्यांमधून बेसाल्टी लाव्ह्यांची उद्गिरणे झाली. लाव्ह्यांचे हे थर बहुधा क्षितिजसमांतर आहेत. पायऱ्या−पायऱ्यांप्रमाणे दिसणाऱ्या या खडकांना स्विडीश ट्रॅपन या शब्दावरून ट्रॅप हे नाव पडले आहे व हे भारतीय उपखंडाच्या दक्षिणेकडे सापडतात म्हणून त्यांना दक्षिण ट्रॅप अशी संज्ञा आहे. ह्याच थरांमध्ये कोठे कोठे अंतःस्तरित असे गोड्या पाण्यातील अवसादी खडक सापडतात. त्यांस अंतरा-ट्रॅपी थर असे म्हणतात. महाराष्ट्रात असे थर विदर्भात (टाकळी, नागपूरमधील सिताबर्डी टेकडी) व मुंबई शहरात आढळतात. या थरांमध्ये गोड्या पाण्यातील जीवसृष्टीचे अवशेष आढळतात. विदर्भातील अंतरा-ट्रॅपी थर हे क्रिटेशस कालखंडातील असून मुंबईतील अंतरा-ट्रॅपी थर पॅलिओसीन (सु. ६.५ ते ५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालातील आहेत. असे त्यांत आढळणाऱ्या जीवाश्मांवरून वाटते. या काळाच्या शेवटी भारतीय द्वीपकल्पाच्या हवामानामध्ये झालेला बदल जांभ्या दगडांच्या निर्मितीस पोषक ठरला. जांभा दगड कोकण पट्टीत सर्वत्र, सातारा व कोल्हापूर ह्या जिल्ह्यांच्या पश्चिम भागांत विपुल सापडतो.
महाराष्ट्रात अभिनव कालखंड:
महाराष्ट्रात अभिनव (गेल्या सु. ११ हजार वर्षांच्या) कालखंडामध्ये तापी, गोदावरी, पैनगंगा, वैनगंगा इ. नद्या व त्यांच्या काही उपनद्यांच्या पात्रांच्या दोन्ही बाजूंस जलोढाने (गाळाने) तयार झालेली जमीन आहे. ह्याच कालखंडामध्ये सागर किनारा उचलला गेल्याने कोकण किनाऱ्यावर सागरी चुनखडकांची निर्मिती झाली. चुनखडकाच्या या थरांची जाडी फारच कमी (५ मी. पेक्षाही कमी) आहे. ह्या चुनखडकांस कोकणातील लोक ‘करळ’ असे म्हणतात.
Post a Comment